अहिल्यानगर जिल्ह्यात बाराच्या बारा जागी महाविकास आघाडी निवडून येणार
३५ वर्ष सत्ता असून राहत्याचा विकास का नाही?
एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान देऊ नये ते का स्वीकारले नाही?
काहींनी संगमनेरला रणभूमी करण्याचे ठरविले होते
शिर्डीच्या हॉस्पिटलला कोण अडथळे आणतय
मंगळवार १९ नोव्हेंबर
संगमनेर – आचारसंहिता काळातही जिल्हा प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली काम करत असून एकतर्फीपणे वागत आहे. राजकारणासाठी जनतेच्या प्रश्नांची कोणी खेळू नये असे सांगत यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तीन तक्रारी केल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली.
राज्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची सोमवारी सायंकाळी सांगता झाली तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष जयश्री थोरात उपस्थित होत्या. पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना थोरात म्हणाले मी राज्यभर प्रचारानिमित्त दौरे केले. राज्यात महाविकास आघाडी १८० पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल तर अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळेल. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला भाव नाही. दुधाला भाव नाही. इंधन दरवाढ, ठप्प झालेला विकास यामुळे जनतेच्या मनात प्रचंड रोष आहे. 
मी राज्यात फिरत असताना काहींनी संगमनेरला रणभूमी करण्याचे ठरविले होते. मात्र माझ्या गैरहजरच्या काळात संगमनेर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी सांभाळली आहे. निवडणुकीनंतर मीच पुन्हा येथील आमदार असेल. शेजारच्या नेत्यांना एका व्यासपीठावर येऊन विकासासंदर्भात चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. मात्र त्यांनी ते आव्हान स्वीकारले नाही. ३५ वर्ष एका घरात सत्ता, खासदार, मंत्री, आमदार, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे असताना देखील त्यांना राहता तालुक्याचा विकास करता आला नाही.
नगर-मनमाड रस्त्याची मोठी दुरवस्था असून यामुळे हजारो नागरिकांचे प्राण गेले आहे. साई संस्थानमधील ५९८ कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत. शहराचा आराखडा विकसित झालेला नाही. साई संस्थांनचे सुसज्ज हॉस्पिटल असताना खाजगी २०० बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची गरज काय. असे विचारताना साई संस्थान मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकले असते मात्र तेथे ते होऊ दिले जात नाही. संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला जातो आहे.
मूळचे भाजपचे कार्यकर्ते यांची दुरवस्था करून टाकली आहे. शिर्डीच्या अनेक जमिनींवर आरक्षण टाकून जनतेला वेठीस धरले आहे. शिर्डीमध्ये अवैध धंदे, गुन्हेगारी वाढली आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर सर्वांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवून प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
संगमनेरमध्ये ज्याप्रमाणे शांतता, सुव्यवस्था आणि विकास आहे. तसे काम राहता तालुक्यात करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राहता तालुक्यातील प्रश्नांसाठी वेळेला रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी मी तयार आहे. ही राहता तालुक्यातील जनतेच्या स्वातंत्र्याची लढाई असून सर्वांनी सहभागी होऊन घोगरे यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
आचारसंहितेच्या काळातही प्रशासन कुणाच्यातरी दबावाखाली… यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. धरणांमध्ये चांगला पाऊस आहे. असे असतानासुद्धा आमच्या तळेगाव पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी दिले जात नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासन ही मागणी टाळत आहे. राजकारणासाठी जनतेशी कोणी खेळू नये. प्रशासन कुणाच्या दबावाखाली आहे हे कळाले पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रशासनाने असे एकतर्फी वागणे अत्यंत चुकीची आहे. प्रशासनाने नेहमी जनतेच्या हितासाठी काम केले पाहिजे.


