संगमनेर विधानसभा निवडणूक विश्लेषण – अनंत पांगारकर
राज्यात काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या आणि दिग्गज नेते, हायकमांडशी थेट संपर्कात असलेले म्हणून देशभरात परिचित असलेल्या बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमधून धक्कादायक पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर टाकलेला अति आत्मविश्वास आणि लाभार्थी, चमचे, ठेकेदार, तरुणाईचा न आलेला अंदाज, लाडक्या बहिणीचा फॅक्टर, संगमनेरमध्ये निर्माण केलेले धार्मिक ध्रुवीकरण, चिट्ठी संस्कृती यांच्यामुळेच थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला. मतदार संघातील लाभार्थ्यांचे घोटाळे, मतदार संघातील प्रश्न, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी निर्माण झालेली दहशत हे मुद्दे घेऊन प्रचारात उतरलेले आणि शिवसेनेकडून निवडून आलेले अमोल खताळ थोरात यांच्या पराभवासाठी केवळ निमित्तमात्र ठरले.
परंपरागत विरोधी शिवसेना सोबत असूनही पराभव – १९८५ पासून सलगपणे चार दशके संगमनेरचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी कोणताही डाग लागू न देता लीलया पार पाडली. राज्याच्या राजकारणात सुसंस्कृत नेता अशी ओळख निर्माण करणारे थोरात नवव्यांदा निवडणुकीला सामोरे जात होते. सातत्याने विश्वास दर्शविणारे संगमनेरकर त्यांच्या पाठीशी ठाम होते, थोरात पराभूत होतील अशी कोणतीही शक्यता या मतदारसंघात नव्हती. सोबतीला आत्तापर्यंत त्यांचे प्रमुख विरोधी असलेला ठाकरेंचा शिवसेना पक्ष असून देखील थोरात यांचा झालेला पराभव आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारा ठरला असून या पराभवामागील अनेक कारणे आता समोर येऊ लागली आहे. 
अति आत्मविश्वास नडला – आत्तापर्यंत थोरात यांच्या विरोधात विरोधकांनी सातत्याने निवडणुका लढविल्या मात्र विरोधकांच्या पदरी अपयश पडत होते. याही निवडणुकीत शिवसेनेकडून थोरात यांच्या विरोधात समोर आलेला उमेदवार आत्तापर्यंतच्या इतर उमेदवारांच्या तुलनेत अगदीच सामान्य होता. सलग आठ निवडणुकांमध्ये निवडून येणाऱ्या थोरात यांच्यासमोर अगदी नवखा असलेला हा उमेदवार फार काही किमया करू शकणार नाही, हा आत्मविश्वास थोरात यांच्यासह त्यांच्या समर्थकांना होता. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर थोरात यांनी टाकलेला तो आत्मविश्वासच नडल्याचे निवडणूक निकालानंतर समोर आले.
लाभार्थी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमुळे नाळ तुटली – ज्या समर्थकांच्या बळावर थोरात संगमनेरमधील निवडणूक सोडून राज्यभर पक्षाच्या बांधणीसाठी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दौरे करत होते. त्याचवेळी थोरात यांच्या मतदारसंघात त्यांचे समर्थक ग्राउंड लेव्हलवर कोठेही कार्यरत नव्हते. पक्षात नेमलेले पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी संगमनेर तालुक्यात प्रति आमदार म्हणून मिरवत असताना त्यांनी थोरात यांची जनतेशी असलेली नाळ तोडण्याचे काम आपल्या कृतीतून केले. याची वारंवार जाणीव काही लोकांनी थोरात यांच्या यंत्रणेला करून दिली, साहेबांचा संपर्क घडवून आणा, असे वारंवार सांगितले मात्र यंत्रणेतील लोकांनी या ग्राउंडवर काम करणाऱ्या सामान्य माणसांची कोणतीही दखल घेतली नाही, परिणामी जे रोखता येऊ शकत होते ते रोखण्यात अपयश आले. छोट्या-छोट्या गोष्टींची परिणती मोठ्या पराभवात झाली. त्यामुळे थोरात यांचा पराभव राज्यात चर्चेचा विषय ठरला. राज्याच्या राजकारणातल्या सरळ आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा पराभव झाल्याने केवळ संगमनेरकरच नव्हे तर राज्यातील अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
चुकीच्या लोकांमुळे चांगले पदाधिकारी दुरावले – अशोक मोरे यांच्या निधनानंतर राज्यस्तरावर काम करणाऱ्या बाळासाहेब थोरात तालुकास्तरावर सक्षमपणे काम करणारे स्थानिक नागरिकांप्रती नाळ असलेले, चुटकी सरशी त्यांच्या कामांची सोडवणूक करणारे प्रती नेतृत्व तयार झाले नाही. ज्यांच्या बळावर थोरात यांनी खालच्या यंत्रणा सोपविल्या त्यांनी थोरात यांच्या नावाचा वापर करत अनेक गैरप्रकार तालुक्यात सुरू केले. थोरात यांच्याभोवती असलेल्या काही कार्यकर्ते, पदाधिकारी, लाभार्थी, चमचे यांनी अनेक उद्योग करत गावागावात आपल्याच कार्यकर्त्यांवर आणि सामान्य माणसांवर निर्माण केलेली दहशत, गैरमार्गाने केलेले आर्थिक गैरव्यवहार, अप्रत्यक्षपणे मिळविलेला पैसा, गौण खनिज, वाळू तस्करी, जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार, ठेकेदारांशी केलेली भागीदारी अशा अनेक कारणांनी अप्रत्यक्षपणे थोरात जसे बॅक फुटवर जात होते तसेच ग्रामीण भागातील काही चांगले कार्यकर्ते, सक्षमपणे संस्था चालविलेले पदाधिकारी देखील अशा चुकीच्या लोकांमुळे आणि साहेबांकडून त्यांना मिळणाऱ्या वरदहस्तामुळे दुरावत होते. ते पक्षासोबत असले तरी सक्रिय नव्हते.
गैरव्यवहार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना अभय – संस्था बदनाम करणे, संस्थेच्या माध्यमातून ठेवेदारांची लूट करून स्वतःचे घर भरणे असे देखील प्रकार थोरात समर्थकांनी केले. यातील बहुतेक प्रकार थोरात यांच्या कानावर गेले तर अनेक प्रकार त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. मात्र जे प्रकार कानावर गेले त्यात थोरात यांनी लक्ष न घालता त्यांना पाठीशी घातल्याने त्याचा देखील फटका या निवडणुकीत बसला. संस्थांमधील गैरव्यवहाराचे वानगीदाखल उदाहरण म्हणून दूधगंगा पतसंस्थेच्या गैरव्यवहाराकडे बघता येईल. दूधगंगेतून तब्बल शंभर कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक करत ठेविदारांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भाऊसाहेब कुटे आणि आर्थिक गैरव्यवहारात आरोपी असलेल्या अमित पंडित, दादासाहेब कुटे आदी जवळच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर थोरात यांनी प्रखरपणे न केलेली कारवाई किंवा त्या संदर्भात ठोस घेतलेली भूमिका कधीही नागरिकांना दिसली नाही. 
कुटुंब प्रमुखाचे मौन – याशिवाय शहरात निर्माण झालेल्या हिंदू मुस्लिम धार्मिक वादात थोरात यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही. कोल्हेवाडी रोड, निंबाळे, जोर्वे नाका, दिल्ली नाका आधी हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी झालेल्या वादात कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे थोरात सातत्याने दुसऱ्या समाजाला पाठीशी घालत असल्याचे झालेले आरोप त्यांना अडचणीत आणत होते. शहरातील बोकाळलेले अवैध धंदे, कत्तलखाने, मुस्लिम बहुल भागात रस्त्यांवरील अतिक्रमणे, शहरातील वादाला कारणीभूत ठरणारे अवैध व्यवसाय यावर थोरात यांचा प्रशासनावर नसलेला वचक, शहरात बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी या धंद्याच्या माध्यमातून जमवलेली माया आणि सामान्य माणसाला दिलेला त्रास याकडे दुर्लक्ष खरंच बाळगलेले मौन हे देखील एक प्रमुख कारण ठरले.
चिट्ठी नडली – निवडणुकीच्या पराभवानंतर प्रत्यक्षात सामान्य माणसाशी केलेल्या चर्चेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. साहेब व्यक्तिगत अतिशय चांगले आहेत. त्यांच्याविषयी आमची कोणतीही नाराजी नव्हती. मात्र गावागावात त्यांच्या चमच्यांमुळे आम्हाला त्रास होत होता, आम्हाला साहेबांना पाडायचे नव्हते, केवळ त्यांचा लीड कमी करायचा होता, या चमच्यांमुळे साहेब प्रत्यक्षात आमच्यासारख्या रंजल्या गांजलेल्या लोकांमध्ये येऊ शकले नाही. आमच्या व्यथा त्यांच्यापर्यंत जाऊ शकल्या नाही. त्यांच्यापर्यंत कार्यकर्ते, त्यांचे लाभार्थी पदाधिकारी पोहोचू देत नव्हते. साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला तर गावात दादागिरी करत होते. माझ्याशिवाय, माझ्या चिठ्ठीशिवाय काही होऊ शकत नाही असे सांगत होते. साहेबांच्या यशोधन संपर्क कार्यालयात गेल्यानंतर तेथे काम होईलच याची कोणती शाश्वती नव्हती. कारण तेथे बसलेले पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिकांविषयी चुकीची माहिती देत होते. या माध्यमातून निर्माण झालेली नाराजी थोरात यांना पराभवाकडे घेऊन गेली.
हा ठरला अमोल खताळ यांचा प्लस पॉईंट – याउलट आपल्या छोट्याशा सायबर कॅफेमध्ये बसून सरकारच्या विविध योजनांची माहिती, फॉर्म भरून देत थेट सामान्य माणसाशी अमोल खताळ यांनी आपली नाळ जोडली होती. त्यातच संजय गांधी निराधार योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनेची जबाबदारी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खताळ यांच्यावर सोपविल्यानंतर या माध्यमातून त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद ठरले. गावागावात या माध्यमातून अमोल खताळ पोहोचले होते. थोरात राज्यस्तरावर प्रचार यंत्रणा राबवत असताना इकडे त्यांच्याच मतदारसंघात विखेंच्या मदतीने अमोल खताळ गावागावात, वाड्या वस्त्यांवर जाऊन पोहोचले. आणि मतदारांना ते विश्वास त्यांच्या प्रलंबित कामासंदर्भात देऊ लागले. एकीकडे राज्यस्तरावर काम करणारा आणि आपल्यापासून दुरावलेला आपला कुटुंबप्रमुख आणि दुसरीकडे आपल्यासाठी आपल्या प्रश्नांकरिता थेट कोठेही कोणत्याही अधिकाऱ्यांशी भिडणारा आपला भाऊ म्हणून अमोल खताळ यांच्याकडे बघितले जाऊ लागले. त्यामुळे तब्बल १,०१,८२६ मतदार सोबत असून देखील थोरात यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावं लागलं.

