बुधवार २७ नोव्हेंबर – मुंबई
मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू असताना आता त्यात पुन्हा एका नव्या वादाची भर पडली आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद सुरू झाल्याचे समोर येत आहे. 
पालकमंत्रीपदावरून ठिणगी – राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील चार दिवस उलटून गेले तरी सत्ता स्थापन करण्यात अपयश आले आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू असतानाच आता पालकमंत्री पदावरून देखील वादाची ठिणगी पडली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाची पसंती देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पद कायम ठेवण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदारांकडून केली जात आहे. 
मंत्री ठरण्याआधीच पालकमंत्री – महायुती सरकार मध्ये मुख्यमंत्री निश्चित झाल्यानंतर मंत्री निवडले जाणार आहे मात्र तत्पूर्वीच अनेकांकडून मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावले गेली असून पालकमंत्री पदासाठी देखील स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या शपथविधी वेळी कोणाला मुख्यमंत्री, मंत्रिपदाची लॉटरी लागते याची उत्सुकता ताणली गेली आहे. तसेच नव्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून देखील वाद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
महत्त्वाचे चार खाते भाजपकडेच – दरम्यान राज्यात सत्ता स्थापनेचा घोळ सुरू असतानाच मिळालेल्या बहुमताच्या बळावर भाजपाने गृह, वित्त, नगर विकास आणि महसूल खाते आपल्याकडेच ठेवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सत्तेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला दुय्यम खात्यांवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

