शनिवार, ३० नोव्हेंबर – मुंबई
राज्यात महायुतीसाठी स्पष्ट बहुमत मिळून आठवडा उलटला आहे तरी देखील नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला नाही. यामुळे महायुतीत मोठ्या प्रमाणात धूसपुस सुरू असल्याचे समोर येत आहे. गृहमंत्रीपदावर आडून असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य चार मंत्र्यांच्या नावाला आता भाजपने विरोध केल्याचे समोर येत आहे. शिंदे गटाकडून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय देखील भाजपच घेत असल्याचे समोर आल्याने शिंदे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 
फडणवीसच मुख्यमंत्री – महायुतीचे मुख्यमंत्रीपद कोणाच्या गळ्यात पडणार? यावरून सत्तेवर येणाऱ्या महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच दिसत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून होणार असला तरी या पदावर कोणाची नेमणूक करायची याचा पेच आठ दिवसानंतरही कायम आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील असे संकेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत.
शिंदेंचा बारा मंत्रीपदावर दावा – दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी माघार घेत मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचा मार्ग मोकळा केला असला तरी ते नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत राज्याच्या गृहखात्यासह १२ मंत्रिपदांची मागणी केली आहे. मात्र आता शिंदे गटाच्या ४ मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती आहे.
या चार नावांना विरोध – शिंदेंच्या शिवसेनेतील अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत, संजय राठोड या चार नेत्यांच्या नावाला भाजपचा आक्षेप आहे. या चारही मंत्र्यांनी केलेल्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी असल्याचे समजते. 
शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष – शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना अजूनपर्यंत नाराज केलेले नाही. त्यामुळे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

