शनिवार ३० नोव्हेंबर – पुणे
राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी, निवडणुकांचा संदर्भ देऊन बाबा लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात असल्याच्या निषेर्धार्थ ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेष उपोषण सुरू केले होते.
ठाकरेंनी सोडले आढावांचे उपोषण – महात्मा फुले वाडा येथे सुरू असलेल्या या आत्मक्लेष आंदोलनावेळी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सकाळी आढाव यांची भेट घेतली. त्या पाठोपाठ सायंकाळी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढाव यांची भेट घेत केलेल्या विनंतीनंतर ठाकरेंच्या हस्ते पाणी पिऊन आढाव यांनी आपले आत्मक्लेष आंदोलन मागे घेतले आहे. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहेत.
यांची उपस्थिती – ठाकरे यांच्यासोबत यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, सुषमा अंधारे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते. 
बाबा आढाव म्हणाले, ‘देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून प्रत्येक निवडणूक पाहत आलो. बराच काळ त्याचा भागही होतो. पण, आता सुरू असलेला भ्रष्टाचार याआधी कधीही पाहिला नाही, निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचारच आहे. मात्र, यावर आयोगाने आक्षेप घेतला नाही, जे अनाकलनीय आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांचे वाटप करण्यात आले. निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत शेकडो कोटींची रक्कम जप्त करण्यात आली, ही देशाच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे’, असे उपोषण सुरू करण्यापूर्वी आढाव म्हणाले होते. याशिवाय, लोकसभा आणि विधानसभेच्या निकालात इतका फरक कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मतदानात काहीतरी गडबड असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.


