सोमवार, ०२ डिसेंबर – संगमनेर
तब्बल चार दशके संगमनेरकरांचे लोकप्रतिनिधी व करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला आहे. त्यानंतर विविध पद्धतीने पराभवाचे विश्लेषण होत असतानाच आता मंगळवारी (३ डिसेंबर) प्रथमत:च स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात संगमनेरकरांशी संवाद साधणार आहे. या मेळाव्यात थोरात काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.
येथे होणार – थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयालगतच्या पटांगणात मंगळवारी दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह थोरात यांच्यावर विशेष स्नेह असलेल्या राज्यातील प्रमुखांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.
डॉ. तांबे म्हणाले, विधानसभेचा एकूण राज्यातील आणि संगमनेर तालुक्याचा निकाल हा अनाकलनीय व अनपेक्षित आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली आहे. राज्यभरामध्येही हीच परिस्थिती आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या कामातून संगमनेर तालुका उभा केला आहे. सुसंस्कृत राजकारणाची पद्धत निर्माण केली आहे. तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर विकासाची काम केली आहे.
अनपेक्षित पराभव – याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हा लोकनेते थोरात यांनी पूर्ण करून दुष्काळी भागातील जनतेला पाणी दिले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ऐतिहासिक ठेवा ठरला असून संगमनेर शहरात हायटेक बस स्थानक, विविध वैभवशाली इमारती, बायपास व तालुक्यात अनेक मोठमोठे विकासाची कामे त्यांनी केली आहे. याचबरोबर ग्रामीण विकासातून प्रगती साधताना तालुक्याची बाजारपेठ समृद्ध केली आहे. तालुका हा परिवार मानून प्रत्येकाच्या सु:ख दुःखात ते नेहमी सहभागी राहिले. अशा लोकनेत्याचा पराभव अनपेक्षित असल्याचे ते म्हणाले.


