स्वातंत्र्य सैनिकाचा वारसा आहे लढणार आहोत
मीही हिंदू पण इतर धर्माचा आदर करतो
संगमनेरमध्ये विराट कार्यकर्ता स्नेह संवाद मेळावा
बुधवार ०४ डिसेंबर – संगमनेर
गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी मागील ४० वर्ष अविश्रांत काम केले. त्यातून संगमनेर तालुका उभा राहिला. ही परंपरा आपल्याला यापुढेही जपायची आहे. तालुक्याचा विकास मोडण्यासाठी नवीन लोकप्रतिनिधीचा हत्यार म्हणून वापर होणार आहे. हिंदू मुस्लिम द्वेष पसरून काहींनी राजकारण केले, मीही हिंदू आहे पण सर्व समाजाला सोबत घेऊन काम केले. संकटे आली तरी घाबरायचे नाही, स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा आहे. जनता सोबत असल्याने आपण लढणार आहोत वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असे काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
स्नेह मेळावा – मंगळवारी दुपारी यशोधन संपर्क कार्यालयाजवळील मैदानावर झालेल्या स्नेह संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ.सुधीर तांबे , नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे उपस्थित होते.
थोरात म्हणाले, तालुक्यातील जनतेने आपल्यावर भरभरून प्रेम केले. ४० वर्ष या विभागाचे नेतृत्व करताना अविश्रांत काम केले. मोठ्या कष्टातून तालुका उभा केला. दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका असा लौकिक देशात पोहोचविला. सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श पॅटर्न निर्माण केला. तालुक्यातील गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी राजकारण केले. कधीही कोणाला त्रास दिला नाही .कधी चुकीचा शब्द बोललो नाही. कुणाचे मन दुखवले नाही.
निळवंडेच्या पाण्यासाठी अजून काम करायचे – १९८५ मध्ये पाण्यासाठी मोठा संघर्ष केला त्यातून ३० टक्के हक्काचे पाणी तालुक्याला मिळाले. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला गती दिली. एकही दिवस वाया न घालवता आदर्श पुनर्वसन करून धरण व कालवे पूर्ण केले. ज्यांनी या कामांमध्ये कोणतेही योगदान दिले नाही ते आता श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहे. निळवंडेचे पाणी अजूनही उताराच्या दिशेने गेले आहे ज्या लोकांना पाणी मिळाले नाही त्यांना पाणी देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे.
सखाराम-तुकारामची भांडणे थांबवा – निवडणूक संपली की राजकारण संपले अशी आपली पद्धत आहे. हीच परंपरा आपल्याला जपायची आहे. काही लोकांना तालुक्याचा विकास मोडायचा असून नवीन लोकप्रतिनिधीचा ते हत्यार म्हणून वापर करतील. तालुक्याचे पाणी पळवतील. विकास मोडीत काढतील हे आपल्याला होऊ द्यायचे नाही. आपल्यातील मतभेद मिटवा. गावागावातील सखाराम-तुकारामची भांडणे थांबवा. आपसातील वाद मिटवावे लागतील. गाव पातळीवर एकत्र यावं लागेल. यात डुप्लिकेटपणा नको. काही डुप्लिकेट लोकांची भूमिका तिकडेपण आणि इकडेपण अशी आहे मात्र आता दूध का दूध पानी का पानी होईल, संघटित होऊन लढावं लागणार आहे.
मी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. जनता आपल्याबरोबर असल्याने आपल्याला लढायचे आहे. प्रसंगी मेहनतीने चळवळीने प्रश्न मार्गी लावू, रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. आपला सहकार चांगला आहे. बाजारपेठ चांगली आहे. शेती समृद्ध झाली आहे. बायपास, हॅपीहायवेसह बसस्थानक, शहरातील भव्यदिव्य इमारती आणि निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन असे अनेक मोठमोठे प्रकल्प आपण राबवले आहे. काम केले त्याबद्दलची कृतज्ञता ठेवली पाहिजे. विरोधकांना हा विकास दिसत नाही का असा सवाल केला.
बदनामीचे षडयंत्र – १९८५ पूर्वी संगमनेर हे दंगलीचे शहर म्हणून ओळखले जायचे. ही ओळख पुसत सर्व समाजामध्ये आपण बंधुभाव निर्माण केला. एक आदर्श वातावरण तयार केले. मीही हिंदू आहे, परंतु इतरांचा कधीही द्वेष केला नाही. मानवता हा धर्म पाळून काम करत आहोत. मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. अनेक तीर्थस्थळ उभे केली आहेत. परंतु विरोधकांनी काही खोट्या एजन्सी तयार करून खोटे व्हिडिओ टाकून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे. या निमित्ताने बिळात लपलेले काही लोक बाहेर आले आहे. एक बाई शिव्या देते, ज्यांचे विचार चुकीचे आहे ते लोक येथे बोलत आहेत.
सत्तेचा गैरवापर – सत्तेचा गैरवापर करून तालुक्यातील आपल्या अनेक कार्यकर्त्यांवर त्यांनी खोट्या केसेस टाकल्या. अनेकांच्या प्रपंचात माती कालवली. हे सर्व थांबवण्यासाठी आपण शिर्डी मतदार संघात जाऊन लढा दिला असल्याचे ते म्हणाले.
- डॉ. तांबे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत सेवाभावीपणे काम करून तालुका उभा केला. भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी मिळवले. निळवंडे धरण व कालवे निर्माण केले. देशासाठी आदर्शवत सहकार निर्माण केला. गावागावात विकासाची कामे केली. मंत्रीपदाच्या माध्यमातून संगमनेरचा लौकिक राज्यभर वाढवला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे व्यक्तिमत्व आणि काम आपल्या पाठीशी आहे. खोटे नाटे व्हिडिओ पसरून घाणेरडे राजकारण केले जात आहे. परंतु आपण लढणारी माणस आहोत. आमदार थोरात यांनी कायम आदर्श मूल्य जपली. राजकारणातील पावित्र्य जपले. कार्यकर्ते दुःखी झाले असतील मात्र निराश होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये या संकटावर मात करून पुन्हा राज्याचे नेतृत्व संगमनेर तालुक्याकडे येईल यासाठी काम करा. थोरात यांनी राजकारणातील पावित्र्य जपले. कधीही तत्त्वांची तडजोड केली नाही मात्र जातीय तणाव निर्माण करून द्वेष भावना पसरून घाणेरडे राजकारण करणाऱ्या मंडळींनी संस्कृत नेतृत्वाचा पराभव नव्हे तर घात केला.
-