शनिवार, ०७ डिसेंबर – संगमनेर
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार मधील गिर्हेवाडी, सुतारवाडी, पायरवाडी येथील ग्रामस्थांना पिण्याचे चांगले पाणी मिळावे यासाठी व त्यातील अडचणी लक्षात घेत तत्कालीन लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला सूचना दिल्याने या वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी मिळू लागले आहे. मात्र ज्यांना अद्यापही गाव आणि वाडी ही माहित नाही असे नवनिर्वाचित आमदार बातम्या देऊन जनतेत संभ्रम निर्माण करत आहे, अशी टीका हिवरगाव पठारच्या सरपंच सुप्रिया मिसाळ यांनी केली आहे.
सरपंच सुप्रिया मिसाळ आणि उपसरपंच दत्तात्रेय वनवे म्हणाले, पठार भागातील अनेक वाड्या-वस्त्यांच्या विकासासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी, रस्ते, वीज आदी सुविधांसोबत ग्रामस्थांच्या चांगल्या जीवनमानासाठी थोरात यांनी सदैव काम केले आहे. मात्र आमच्या गावातील वाड्यांना नवनिर्वाचित आमदारांनी पाणी मिळवून दिले अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. ज्या व्यक्तीला अजून आमचे गाव माहित नाही, वाड्या माहिती नाही त्याने काय केले हा मोठा प्रश्न आहे.
थोरात यांच्या माध्यमातून पाणी – थोरात यांनी या भागात विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे केली आहे. थेट सुतारवाडी पर्यंत उंच भागावर पाणी पोहोचविण्यासाठी त्यांनी काम केले. मात्र विद्युत पंपात बिघाड झाल्याने काही दिवस पाणी पुरवठा करता येत नसल्याने यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांसह आम्ही थोरात यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर याची दखल घेत थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयाने व संबंधित यंत्रणेने पाठपुरावा केल्याने विद्युत पंप सुरू झाला आणि पाणी देता येऊ लागले.
पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश – थोरात यांच्या सूचनेवरून उपसरपंच दत्तात्रय वनवे, ग्रामसेवक विजय आहेर, रामदास गोंदके, सोपान डोळझाके, भाऊसाहेब नागरे, प्रकाश मिसाळ, बाळू दुधवडे, भाऊसाहेब पवार आदींनी केलेल्या प्रयत्नानंतर विद्युत पंप सुरू करून हिवरगाव पठारच्या सुतारवाडी, पायरवाडी व गिऱ्हेवाडी या गावांना योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.

सत्ता असो वा नसो बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहे. आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने काम होत असतात आणि होत राहील. मात्र ज्यांना अद्याप हिवरगाव पठार माहित नाही, ज्यांना या वाड्या माहिती नाही ते संगमनेरमध्ये बसून बातम्या देत आहे हे कितपत योग्य आहेत. आमची एक अपेक्षा आहे की तुम्ही नवीन काहीतरी करून दाखवा, नवीन निधी आणून दाखवा, जुने सर्व कामे ही बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केली आहे आणि त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत. – रामदास गोंदके, ग्रामस्थ, गिऱ्हेवाडी.
ज्यांनी अजून आमदारकीची शपथही घेतली नाही ते आमदार आता विकासाच्या बाता मरत आहेत हे अत्यंत चुकीचे आहे. आणि यापुढील काळात अशा चुकीच्या बातम्या देऊन भ्रम करण्याचा प्रयत्न केलाच आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करू. – उपसरपंच दत्तात्रय वनवे
गिर्हेवाडी पायरवाडी व सुतारवाडी येथील आदिवासी नागरिकांकरता हिवरगाव पठारमधून दिल्या जात असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनचा विद्युत पंप तातडीने सुरू करण्याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन यंत्रणेने मोठा पाठपुरावा केला. याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांनी या कामासाठी मदत केली आणि त्यामुळे आम्ही तातडीने या गावांना पाणी देऊ शकलो. – बाळू दुधवडे (पाणी सोडणारे)
आम्ही अगदी डोंगर भागात राहतो. पठार भागात राहतो. आम्हाला अनेक दिवस लाईट नव्हती. ही लाईट, रस्ता पाणी देण्याचे काम आमचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. इथे नवीन कोण आहे हे आम्हाला माहित नाही. आम्ही यापुढेही काहीही लागले तरी बाळासाहेब थोरात यांच्याकडे जाणार. – लक्ष्मीबाई वनवे.


