सोमवार ९ डिसेंबर – संगमनेर
बांगलादेशामध्ये सुरू असलेल्या हिंदूवरील अत्याचार थांबविण्यासाठी भारत सरकारने राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशामधील हिंदू बांधवांना दिलासा देण्याची मागणी संगमनेर काँग्रेसने प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
सोमवारी सायंकाळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशच्या निर्मितीमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान असून भारतामुळेच बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला आहे. मात्र बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर सध्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहे. मालमत्तेची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे तेथील हिंदू बांधवांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाची भारत सरकारने बांगलादेश सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडावे. व तेथील हिंदू नागरिकांना योग्य ती सुरक्षा द्यावी. याचबरोबर इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णादास यांची तातडीने सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यासाठी कोणता अधिकारी कार्यालयात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, योगेश जाजू, अरुण गावित्रे, प्रमोद कडलग, विशाल ढोरे, बाबा खरात आदींसह महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी उपस्थित होत्या.
हिंदूंवर होणारे अत्याचार अत्यंत दुर्दैवी – हिंदू धर्म हा सहिष्णु असून मानवतेचा विचार देतो. बांगलादेशची निर्मिती हीच भारतीयांनी केली आहे. मात्र सध्या तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे तातडीने भारत सरकारने त्या सरकारला सुनावले पाहिजे. याचबरोबर सर्व हिंदू धर्मीयांना संरक्षण मिळाले पाहिजे. – दुर्गाताई तांबे.
मंगळवारी होणाऱ्या मोर्चास पाठिंबा – मंगळवारी होणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चास पाठिंबा – बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उद्या मंगळवारी (१० डिसेंबर) होत असलेल्या संगमनेरमधील सकल हिंदू समाजाच्या मोर्चास काँग्रेस पक्षाचा व आपला जाहीर पाठिंबा असून या मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष, विविध पुरोगामी संघटना विविध संस्था व सहकारी संघटना यांचे पदाधिकारी सहभागी होणार आहे. – डॉ. जयश्री थोरात.


