मंगळवार, १० डिसेंबर – संगमनेर
बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत आहे. हिंदूंची मंदिरे, घरे जाळण्यात, तोडण्यात येत आहे. हिंदू साधूंना तुरुंगात टाकले जात आहे. याच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये मंगळवारी सकाळी सकाळ हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
यांचा सहभाग – सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेला या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक पदाधिकारी तसेच संगमनेरकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटना देखील सहभागी झाल्या. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ देखील यावेळी उपस्थित होते.
यांना दिले निवेदन – मंगळवारी सकाळी लाल बहादूर शास्त्री चौकातून निघालेला हा मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर येऊन धडकला. मोर्चासमोर महानुभव पंथाचे विजय महाराज बाळापुरकर, प्रा. सोपानराव देशमुख यांची भाषणे झाली. दोघांनीही आपल्या भाषणातून बांगलादेशमधील परिस्थिती विशद केली. संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
अशी आहे बांगलादेशातील परिस्थिती – गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशात मोठा हिंसाचार उफाळला आहे. बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत नाहीत असा दिवस जात नाही. बांगलादेशात १ कोटी ३१ लाख हिंदूंच्या जीवाला धोका आहे. कधी मंदिरे पाडली जात आहेत, तर कधी पुतळे तोडले जातात, हिंदू प्रतीकांची विटंबना केली जात आहे, निषेध करणाऱ्या हिंदूंच्या हत्या केल्या जातात. अनेक व्हिडिओ असे आहेत जे पाहताही येणार नाही. प्रत्येक व्हिडिओमध्ये हिंदूंवर क्रूरता कळस गाठत आहे. हल्ले आणि धमक्यांची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या आणि शांततेत पार पडलेल्या या मोर्चाला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला.
यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त – संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा वेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

