बुधवार, १० डिसेंबर – मुंबई
लोकभावनेची दिशा तुम्हाला कळली असती तर आज ही दशा झाली नसती. लोकांच्या मनात काय ते तुम्हाला कळलेच नाही, परिणामतः बाळासाहेब थोरात आज सभागृहात नाही, नाना पटोले तुम्ही तर २०८… म्हणजे थोडक्यात वाचले, असे चिमटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढले.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अनुक्रमे एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना शिंदे यांनी लोकांनी तुम्हाला नाकारले आहे हे वास्तव स्वीकारा, असे आवाहन विरोधकांना केले. 
काँग्रेसला ८० लाख मते मिळूनही १६ जागा कशा मिळाल्या, असा प्रश्न विरोधक करत आहेत. लोकसभेला आम्हाला ७३ लाख मते पडली; पण जागा सातच आल्या, तेव्हा तुम्हाला ईव्हीएम नाही आठवले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
‘रडीचा डाव किती दिवस? आपला करेक्ट कार्यक्रम’…
लोकसभेला आम्ही कमी पडलो तेव्हा रडत नाही बसलो, तुम्ही विधानसभेला हरलात तर रडीचा डाव खेळत ईव्हीएमला दोष देताय. उगाच स्टंटबाजी करताय, आपला करेक्ट कार्यक्रम झाला आहे, हे लक्षात घ्या, अशी बोचरी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत विरोधकांवर केली.
जनतेने दिलेल्या विजयाची टिंगल का करता?
मी २०८ मतांनी निवडून आलो म्हणून माझी टिंगल केली जात आहे. जनतेने मला निवडून दिले आहे. राहुल नार्वेकर यांचे पटोले यांनी अभिनंदन केले. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पटोले यांच्या २०८ च्या मताधिक्यावरून त्यांना चिमटे काढले होते. पटोले त्यावर म्हणाले की, मी किती मतांनी जिंकलो ते महत्त्वाचे नाही. तुम्ही आज जी टिंगल करत आहात ती योग्य नाही. – नाना पटोले.


