बुधवार, ११ डिसेंबर
सातारा – व्यवस्थेला लागलेली लाचेची कीड किती भयानक आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून साताऱ्यामध्ये मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. 
या सर्व घडामोडी सत्र न्यायालयाच्या आवारात घडल्यानंतर साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून जिल्हा व सत्र न्यायाधीश महोदय धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यानंतर, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. न्यायाधीशालाच लाच घेताना पकडण्यात आले आहे. त्यामुळे लाचखोरीमध्ये न्याय यंत्रणादेखील बरबटल्याचे समोर आले आहे. राज्यातील न्याय पालिका क्षेत्रात मोठी खळबळ या कारवाईमुळे उडाली आहे.
फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी संबंधितांकडून पाच लाखांची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती आहे. पुणे-सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र, चक्क न्यायाधीश महोदयच लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

