शनिवार, १४ डिसेंबर
संगमनेर – शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवसाय पूर्व कौशल्य मिळावीत, आपली कार्य संस्कृती आणि आधुनिक व्यवसाय याविषयी माहिती तसेच स्वतःचे करिअर निवडण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये २१ ते २३ डिसेंबर दरम्यान भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला महोत्सवाच्या दरम्यान ७२०० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यवसाय पूर्व कौशल्य शिकविली जाणार आहे.
महोत्सवादरम्यान २३ डिसेंबरला एकाच वेळी पाचवी ते नववी दरम्यान शिकणारे ७,२०० विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे गायन देखील करणार आहे. राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य उपक्रमाची माहिती एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बालभारतीचे विशेष अधिकारी डॉ. अजयकुमार लोळगे, प्रकल्प कार्यवाह प्रकाश पारखे यांनी दिली आहे.
२१ डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजता राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात या कला महोत्सवाचा उद्घाटन समारंभ होणार आहे.
या कलाप्रकारांचा समावेश (कंसात प्रशिक्षक)… ओरिगामी (विद्याधर म्हात्रे), पेपर क्वीलिंग (नागसेन भालेराव), नारळाची करवंटी (सुनील मोरे), बुरुड काम (वैशाली वडतल्ले), पतंग तयार करणे (मुजाहिद अत्तार), कॅनव्हास पेंटिंग (मिनीनाथ जोर्वेकर), निसर्ग चित्र (विजय पवार), जलरंग (राहुल भालेराव), कागदाची फुले (सरोदे), स्क्रीन प्रिंटिंग (राजू शेलार), सौंदर्यप्रसाधने (किशोर नगरकर), डूडल आर्ट (संतोष गोरे), रांगोळी रेखाटन (दिलीप कुडके व माया आडकी), प्रिंट मेकिंग (संजय सोनवणे), मातीकाम (दिलीप वाकचौरे), कागदी बोळे (संतोष थळे), पपेट शो (संगीता पुंडगे), ग्लास आर्ट (श्रीपतवाड), अक्षरलेखन (ज्ञानेश्वर कवडे), रस्ता सुरक्षा व फायर सेफ्टी (आरटीओ पुणे), व्यसन बंदी (सलाम बॉम्बे टीम), झुंबा (विनोद कागडे), वारकरी संस्था (सखाराम तांगडे व ज्ञानेश्वर रंधे) सायकल दुरुस्ती, पुष्पगुच्छ तयार करणे, वारली चित्रकला आदीचा समावेश आहे.
या शाळांचा असेल सहभाग – सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या २४ शाळा, मातोश्री रु. दा. मालपाणी विद्यालय, ज्ञानमाता विद्यालय, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, सिद्धार्थ विद्यालय, चंदनेश्वर विद्यालय, स्ट्रॉबेरी स्कूल, अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल, अमृतवाहिनी न्यूडो स्कूल, नूतन माध्यमिक विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, नॅशनल स्कूल, पी. जे. आंबरे पाटील विद्यालय, जिजामाता स्कूल, डॉ. डेरे इंग्लिश मीडियम स्कूल, आनंदवन विद्यालय, बीएड कॉलेज, श्री श्री रविशंकर स्कूल, नवीन मराठी शाळा आणि मेहेर विद्यालय.
या तीन दिवसाच्या कला महोत्सवात तालुक्यातील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून या तीन दिवसात ७२०० विद्यार्थी कला कौशल्यांचे प्रशिक्षण घेणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांच्यावतीने साहित्य वाटप करण्यात येणार असून त्यांनी तयार केलेल्या वस्तू विद्यार्थ्यांना स्वतःकडे घरी घेऊन जाता येणार आहे. २३ डिसेंबरला सुमारे सात हजार विद्यार्थी एकाच वेळी तालासुरात “बलसागर भारत होवो”, “सारे जहाँ से हिंदुस्तान हमारा” आणि उधळीत “शतकिरणा” हे तीन देशभक्तीपर गीते एकाच वेळेस सादर करणार असून या भव्य कला महोत्सवात संगमनेर तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

