सोमवार १६ डिसेंबर
विशेष प्रतिनिधी | मुंबई
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू झाली आहे. गेल्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या अनेकांना डच्चू देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरू आहे. मंत्रीपद न मिळाल्याने महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते नाराज आहे. या नाराजांची मनधरणी करून त्यांची समजूत कशी काढायची, त्यांना शांत कसे करायचे याचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर आहे.
नाराज असलेल्या या दिग्गज नेत्यांना अडीच वर्षानंतर खांदेपालट झाल्यावर संधी मिळणार की पक्षातील आणखी कुठली मोठी जबाबदारी मिळणार यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षातील अनेकांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. मोठे बहुमत मिळाल्याने मंत्रीपदी कोणा-कोणाला संधी द्यायची याचे देखील मोठे आव्हान पक्षश्रेष्ठी समोर होते. त्यातूनच मोठ्या नाराजीला पक्षाच्या प्रमुखांना सामोरे जावे लागत आहे.
महायुतीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मुळातच मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाचे महायुतीत नाव निश्चित होत नसल्यामुळे आणि गृहमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदेंनी घेतलेली ताठर भूमिका यामुळं शपथविधी लांबणीवर गेला.
यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्यावेळी सुद्धा महायुतीत कोणाला किती मंत्रिपदं द्यायची? यावरून एकमत होत नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी लांबणीवर पडला. अखेर रविवारी महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. यात महायुतीतील तिन्ही पक्षातील ३९ जणांनी शपथ घेतली. पंरतू भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांना आणि गेल्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या नेत्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवण्यात आलं आहे.
या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे आणि विजयकुमार गावित यांचा समावेश होता. तर दुसरीकडे शिवसेनेतील अनुभवी नेते दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदासाठी डच्चू देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि अनिल पाटील यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. मंत्रिपद न मिळाल्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षातील हे नेते नाराज आहेत.
नाराज नेते कोणती भूमिका घेणार? याबाबत विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि महायुतीची राज्यातील ताकद आणि वर्चस्व असल्यामुळे हे नाराज नेते अन्य पक्षाचा मार्ग स्वीकारतील असं काही चिन्ह दिसत नाही. कारण महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेची सध्या झालेली वाताहात लक्षात घेता शिंदेंच्या शिवसेनेतील नाराज नेते ठाकरेंच्या शिवसेनेत स्वगृही परततील असं वाटत नाही. हेच चित्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील आहे. त्यामुळे पक्षाकडून अडीच वर्षानंतर संधी मिळेल, याची वाट पाहणे किंवा पक्षाकडून कुठली मोठी जबाबदारी मिळतेय का, किंवा महामंडळावरती संधी मिळते याची वाट पाहण्याशिवाय नाराजांना गत्यंतर नसल्याचं तज्ज्ञ आणि जाणकारांचं म्हणणं आहे.