बुधवार १८ डिसेंबर
छत्रपती संभाजीनगर : आईसोबत शेतात गेलेल्या दोघा सख्ख्या भावांचा खेळताना कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना काल मंगळवारी (१७ डिसेंबर) पैठण तालुक्यातील रजापूर शिवारात घडली. गाळ्यात फसलेल्या चिमुकल्यांच मृतदेह अग्निशामक दलाच्या पथकाने बाहेर काढले. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.
प्रणव कृष्णा फणसे (वय ६) आणि जय कृष्णा फणसे (वय ९, दोघेही रा. आडूळ ता. बुद्रुक पैठण) अशी मृत पावलेल्या दोन चिमुकल्यांची नावं आहेत.
या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा विठ्ठल फणसे यांची रजापूर शिवारात गट क्रमांक २८ मध्ये दोन एकर शेती आहे. दरम्यान, काल मंगळवारी कृष्णा यांची पत्नी वर्षा या कामानिमित्त शेतात गेल्या. यावेळी त्यांची दोन मुलं प्रणव आणि जय त्यांच्यासोबत होते.
प्रणव आणि जय या दोघांना शेतातील एका झाडाखाली सोडून वर्षा कामासाठी गेल्या. यावेळी दोघेही खेळत खेळत कठडा नसलेल्या विहिरीजवळ गेले आणि खेळता खेळता तोल जाऊन विहिरीत पडले.
विहिरीमध्ये प्रणवचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला मात्र जय दिसत नव्हता. जय हा विहिरीतील गाळात फसला असावा असा संशय आल्यावरून नागरिकांनी अग्निशामक विभागाला पाचारण केले. अग्निशामक विभागाच्या अथक प्रयत्नानंतर जयचा मृतदेह गाळातून बाहेर काढला.
दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


