शुक्रवार २० डिसेंबर
संगमनेर – एकीकडे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढत असलेली महागाई, शेतमालाचे वाढते भाव आणि दुसरीकडे सातत्याने पाडले जात असलेले शेतीमालाचे भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीमालाचे भाव सरकारकडून विचार करूनच पाडले जाताय की काय? असा प्रश्न आता प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच पडू लागलेला आहे. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक झाली असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांनी उपस्थित केला आहे.

पडवळ म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून आम्ही संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सातत्याने दूध दरावर आंदोलन करत आहोत. परंतु यावरही तात्पुरती मलमपट्टी करून सरकार शेतकऱ्यांचीच गळचेपी करण्याची भूमिका सातत्याने घेत आहे. दूध, कांदा व सोयाबीनसह अन्य पिकांची सध्या वाईट अवस्था बघायला मिळते. शेतकऱ्यांचा कांदा आता कुठेतरी हाताशी आला होता. बैल पोळ्याच्या सणादरम्यान जो पाऊस झाला त्यात शेतकऱ्यांकडे फ्लावर वाटाणा अशी पिकं सडून गेली. इकडून तिकडून लाल कांदा आता कुठेतरी शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळवु लागला होता त्यावरही सरकारची वक्रदृष्टी पडली व शेतकरी कसा देशोधडीला लागेल याच्या दृष्टीनेच सरकारने कांद्याचे भाव जाणीवपूर्वक पाडले.
प्रत्यक्षात लाडक्या मुख्यमंत्र्यांनी निवडून येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलेले होते. उलट ते आश्वासन न पाळता सत्तेवर बसल्यानंतर कांद्याचे भाव मात्र जरूर पाडले गेले. नक्की मायबाप सरकारला शेतकऱ्यांबद्दल काय भूमिका घ्यायची आहे तेच शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाही. किती दिवस आंदोलन करायचे, कशा प्रकारचे आंदोलन करायचे, किती दिवस सरकारला विनंती करायची याबद्दल कळायला जागा नाही. शेतकरी सगळीकडूनच कचाट्यात सापडला जातोय आधी निसर्ग मग सरकार. “आई घरात खाऊ घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही” मग शेतकऱ्यांनी नक्की जगायचं तरी कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे सातत्याने उभा राहतोय.
खरंतर शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं परंतु हाच राजा आज एका वेळच्या जेवणाला ही महाग होतो की काय अशी परिस्थिती तयार व्हायला लागली आहे. लाडक्या बहिणींमुळे शेतावरती मजूर मिळत नाही. दुधाचे दर कमी असल्यामुळे जोडधंदा असलेला हा व्यवसाय तोट्यात जात आहे. शेतकरी एवढा मेटाकुटीस आलेला आहे की सर्वसामान्य शेतकरी मुलांचे लग्न जमलं सुद्धा मुश्किल होऊन बसले आहे. गावोगाव अनेक तरुण बिनलग्नाचे फिरतायेत. या तरुणांचे नक्की भवितव्य तरी काय असणार आहे? राज्यात अधिवेशन सुरू आहे परंतु जे आमदार-खासदार शेतकऱ्यांच्या मतावरती निवडून येताना आम्ही शेतकऱ्यांचेच पुत्र आहोत अशी अगदी शेतकऱ्यांकडे भीक मागताना दिसतात परंतु नेहमीप्रमाणेच आताही त्यांना शेतमालाच्या भावाचा विसरच पडला आहे.
शेतकऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा प्रश्न नाहीये, अशा भावनेने ते सभागृहात वावरत आहे एकंदरीत शेतकऱ्यांबद्दल कोणीच बोलायला तयार होताना दिसत नाहीये. या मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे, आमची कळवळ समजून घ्या आणि शेतमालाचे भाव वाढवा व तुम्ही दिलेले संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळा.



