सोमवार २३ डिसेंबर
संगमनेर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांची प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आली आहे. गोरगरीब, वृद्ध व निराधार लाभार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी ही प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत केली आहे. 
या मागणीचे निवेदन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना सोमवारी देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणारी अनेक प्रकरणे त्यांच्या नेतृत्वाखाली तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना आदींचा लाभ देणारी प्रकरणे गेल्या काही महिन्यात प्रलंबित ठेवण्यात आली असून त्यामुळे या योजनांच्या लाभार्थ्यांना शासकीय लाभ मिळू शकलेला नाही. ही प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावी तसेच या प्रकरणांसाठी आवश्यक असलेली २१ हजार रुपयांची उत्पन्नाची अट काढून ती ५० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, किशोर पवार, गजेंद्र अभंग, शैलेश कलंत्री, शिवसेना (ठाकरे) दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, विजय उदावंत, दशरथ भुजबळ, रमेश नेहे, संजय कानवडे, सुभाष दिघे, सौदामिनी कान्होरे, सुनीता कांदळकर, किशोर बोऱ्हाडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष गजेंद्र अभंग म्हणाले, संजय गांधी योजनेचा लाभ देणारी सुमारे साडेनऊशे प्रकरणे मंजुरी विना प्रलंबित आहेत. ही प्रकरणे मंजूर करून निराधार व्यक्तींना लाभ दिला जावा. 
समाजातील निराधार, अपंग, वृद्ध व्यक्तींना सातत्याने औषधोपचाराची आवश्यकता असते. त्याकरिता या योजनांच्या माध्यमातून मिळणारा पैसा त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असतो. मात्र मागील काही महिन्यांपासून या योजनांची प्रकरणे प्रलंबित राहिल्याने लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहे. तरी तात्काळ ही प्रकरणे मंजूर केली जावेत यामुळे त्याचा लाभार्थ्यांना फायदा होईल. – दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्ष.


