शनिवार, २८ डिसेंबर
संगमनेर – गुजरातच्या दोघा व्यापाऱ्यांनी संगमनेरमधील शेतमाल विक्रेत्याची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
येथील शेतमाल व्यापारी प्रशांत प्रताप नेहे रा. समनापुर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मनोज भारवाड व सुरेश भारती या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गेल्या पंधरा वर्षांपासून फ्लॉवर व टोमॅटो विक्रीचा व्यवसाय करत गेल्या पाच वर्षांपासून पांडुरंग माधव चांडे (रा. समनापुर) हे त्यांचे भागीदार असून दोघेही आपला शेतमाल बाहेरील राज्यात विक्रीसाठी पाठवीत असतात. फिर्यादी व्यापारानिमित्त अहमदाबाद येथे गेले असताना त्यांची दोन वर्षांपूर्वी मनोज भारवाड व सुरेश भारती (रा. अहमदाबाद, गुजरात) यांच्याशी ओळख झाली. या ओळखीतून धारवाड व भारती यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना फ्लावर विक्री करण्यास सुरुवात केली.
३ जुलै २०२४ रोजी मनोज भारवाड यांच्या सांगण्यावरून सुरेश भारती याने संगमनेर येथे फिर्यादी कडून फ्लॉवर खरेदी घेण्यास सुरुवात केली. तसेच भारती हा यादरम्यान संगमनेरमध्येच थांबला होता. या दोघा शेतमाल विक्रेत्यांसह भारती हा फ्लॉवरचा माल पाहून त्याची खरेदी करून सदरचा माल हा मनोज भारवाड यांच्याकडे पाठवत होता.
माल मिळाल्यानंतर धारवाड व भारती एक-दोन दिवसात फ्लॉवरचे पैसे रोख स्वरूपात देत असत. दोघांनीही पहिल्या आठवड्यात व्यवस्थित व्यवहार केल्यानंतर फिर्यादी व त्याच्या भागीदाराने आरोपींना त्यानंतर महिनाभराच्या कालावधीत १८ ट्रक माल पाठविला. या मालाची किंमत २९,७१,२३५ रुपये एवढी होती. या मालापोटी आरोपींनी फिर्यादी व त्याच्या भागीदाराला १५,४०,००० रुपये रोख स्वरूपात पाठविले. तर उर्वरित १४,३१,२३५ रुपये बाकी ठेवले होते.
त्यानंतर आरोपींनी पैसे देणे बंद केल्याने फिर्यादीने फोन करून आरोपींकडे पैशाची मागणी केली असता पैसे आज देतो, उद्या देतो अशी बतावणी परत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यातील दुसरा आरोपी सुरेश भारती हा संगमनेर येथेच राहत असल्याने या दोन्ही व्यापाऱ्यांना पैसे मिळतील याचा विश्वास होता.
मात्र एक ऑगस्ट रोजी सुरेश भारती हा आरोपी अचानकपणे संगमनेर येथून अहमदाबादला निघून गेला त्यामुळे फिर्यादीने अहमदाबाद येथे जात आरोपींकडे पैशाची मागणी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देत पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे फिर्यादीची सुमारे पंधरा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नेहे यांच्या तक्रारीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहे.

