भाजप आणि आमदार खताळ समर्थकांमधील वादाने दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
संगमनेर, ०३ डिसेंबर
समाज माध्यमातील पोस्ट आणि एकमेकांना टाँट मारण्यावरून भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावरण थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमानंतर झालेल्या हाणामारीची चर्चा शहरात आणि समाज माध्यमात सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखांसमोर हाणामारी करणारे हे पदाधिकारी कार्यकर्ते कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर व विश्वासू समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना अचानकपणे शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने दहशतीच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भारतीय जनता पक्ष निवडणूक लढविण्यास इच्छुक होता मात्र ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेना (शिंदे गटाच्या) वाट्याला गेला. अशातच सोबत असले तरी आमदार खताळ समर्थक आणि मूळ भाजप समर्थक यांच्यात अंतर्गत शीतयुद्ध सुरू होते.
अंतर्गत धूमसत असलेले हे शितयुद्ध गुरुवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर अनपेक्षितपणे उफाळून आले. याचबरोबर मतदार संघात प्रामुख्याने चर्चेचा विषय बनलेला दहशतवादाचा मुद्दा देखील पुन्हा समोर आला आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान गुरुवारी रात्री त्रंबकेश्वर येथे जाण्यासाठी संगमनेरला काही काळ थांबले होते. भाजप पदाधिकारी आणि आमदार खताळ यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.
काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारी व आमदार समर्थक यांच्यामध्ये सोशल मिडीयामधून वाद झाला असल्याची चर्चा आहे. हा वाद काल अचानक उफाळुन आला. विश्रामगृह येथेच हे दोघे आमने सामने येताच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर वादात झाले. खताळ समर्थक कार्यकर्त्याने भाजपाच्या या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याने या पदाधिकाऱ्याचा हाणामारीत चेहरा सुजला होता. त्यामुळे या प्रकाराची परिसरात एकच चर्चा सुरू झाली. आता भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या समर्थकांचेच वाद असे चव्हाट्यावर येत असल्याने संगमनेर तालुक्यामध्ये नव्या वादाला नवे तोंड फुटण्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नगरपालिका निवडणुकीत अंतर्गत वाद पुन्हा समोर येणार… आपल्या चाळीस वर्षाच्या राजकीय इतिहासात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. विखे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) तिकिटावर निवडणूक लढवत थोरात यांचा पराभव केला होता. त्यानंतर संगमनेरात मंत्री विखे यांनी खताळ यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाचा नारा दिल्याने मूळ भाजप समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. या नाराजीचा फटका भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद नगर परिषद बसण्याची चिन्ह आहे.
भाजपकडून गंभीर दाखल… दरम्यान गुरुवारी रात्री झालेल्या खताळ आणि भाजप समर्थक कार्यकर्त्यातील वादाची दखल भारतीय जनता पक्षाने घेतली असून यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक झाल्याची व या प्रकाराची माहिती प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील देण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.


