
कफल्लक देशाला वळणावर आणणारे पंतप्रधान म्हणून ज्यांचा सर्वदूर उल्लेख होतो त्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या दु:खद निधनाच्या कळा प्रामाणिक देशभक्तांसाठी आजही कष्टप्रद आहेत. डॉ. सिंग यांनी देशाला घालून दिलेली अर्थव्यवस्थेची घडी नादान सत्तेमुळे आता पुरती विस्कटून गेली आहे. देशभक्तीचं स्तोम माजवणार्या आजच्या सत्ताधार्यांनी डॉ. सिंग यांच्या दु:खद निधनाचं राजकारण करून निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. धार्मिक अधिष्ठानात मनुष्य प्राण्याला मरणांती परमेश्वराचं रूप दिलं आहे. मनमोहन हे तर देशासाठी अशाच परमेश्वराचं रूप असताना त्यांच्या वाट्याला मात्र या सत्ताधार्यांनी राजकारण आणलं आणि महान व्यक्तीच्या मृत्यूचंही भांडवल करत आपण किती नालायक आहोत, हे जगाला दाखवून दिलं. संकटात देशाला आणि देशवासीयांना जगण्याचा मार्ग ज्या महान देश सेवकाने दिला त्या डॉ. मनमोहन सिंग यांना जग आदर्श मानत असताना आमच्या मूर्ख सत्ताधार्यांना मात्र त्याचं काहीही पडलेलं नाही.
एखाद्या व्यक्तीवर राग काढण्याचे असंख्य मार्ग असतात. जे आजचे सत्ताधीश मोदी आणि शहा बेमालूम वापरत आले आहेत. ईडी, सीबीआय असल्या यंत्रणांचा वापर करत त्यांनी आपल्या विरोधकांना तुरुंगात डांबलं. मनमोहन हे तर अगदीच साधं व्यक्तीमत्व. त्यांच्याशीही हे सत्ताधीश अगदीच निष्ठूर वागले. कधी नव्हे इतकी टिंगल टवाळी सत्तेतल्या या टवाळखोरांनी केलेली देशाने पाहिली. याआधीच्या अनेकांनी मनमोहन यांच्यावर केलेल्या टीका जनतेने ऐकल्या. त्या टीकांमध्ये मानवता असायची, माणसातील माणुसकी त्यात उठून दिसायची. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज यांच्या सारख्यांनी मनमोहन यांच्यावर अनेकदा टीका केली. स्वराज यांनी टीका करतानाही जखम होणार नाही, याची कायम काळजी घेतली. इतकी समज टीकाकारांमध्ये होती. या नेत्यांची केलेल्या टीका त्या दोघांनीही मोठ्या मनाने स्वीकारल्या. म्हणूनच नंतर स्वराज यांनी ‘तू इधर उधर की ना बात कर, ये बता की काफिला क्यो लुटा, हमे रहजनोंसे गिला नही, तेरी रहबरीका खयाल है’ या शब्दात मनमोहन यांना सुनावलं. त्याही टीकेला तितक्याच रुबाबदार उत्तर देताना ‘माना की तेरी दीद के काबील नही हूँ मै, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो कर’, असं उत्तर देताना मनमोहन आणि स्वराज यांना काहीही वाटलं नाही.
स्वत:ची गणना जुन्या जाणत्या नेत्यांशी करतात त्या आताच्या सत्ताधार्यांमध्ये अशी समज राहिली नसल्याने मोदींसारख्या पंतप्रधानाने ‘रेनकोट घालून बाथरूममध्ये अंघोळ करणारे पंतप्रधान’ असली शेलकी टीका मनमोहन यांच्यावर केलेली लोकांनी ऐकली. एक गावगुंडच असल्या टीका करू शकतो, ती मोदींनी केली. तेव्हा मनमोहन सिंग यांना कोणी हसलं नाही. इज्जत गेली ती माझ्या देशाच्या पंतप्रधानाची. जो वाह्यात काहीही बोलू शकतो, आणि त्यांचे निर्लज्ज साथीदार त्याच्यासाठी बाकडं बडवू शकतात तेव्हा. देश चालवणं म्हणजे पत्नी नसलेलं घर चालवणं इतकं सोपं नसतं. त्यासाठी अक्कल नावाची गोष्ट आवश्यक असते. मनमोहन यांच्याकडे देशाची अर्थमंत्रालयाची जबाबदारी आली तो १९९१ चा काळ डोळ्यापुढे आणला तरी देश कोणत्या वळणावर होता, हे लक्षात येतं. देशाचं परकीय चलन १.२ अब्ज इतकं राहिल्याने तीन आठवड्यात देशावर प्रचंड आरिष्ठ येणं तितकं बाकी होतं. आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परत फेड करणं तर त्याहून संकटाचं बनलं होतं.
देश चालवायचा कसा अशा संकटात सापडलेल्या देशातील रिझर्व्ह बँकेकडे असलेलं ६७ टन सोनं स्वीस बँकेकडे गहाण ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय डॉक्टरांनी घेतला आणि देशाची कमान उधारीवर सांभाळता सांभाळता देशाचा मानव निर्देशांक ७ वर नेऊन ठेवला. सोनं हे देशाच्या आर्थिक समृध्दीचं आणि सांस्कृतिक घडणावलीचं प्रतिक मानलं जातं. ते गहाण ठेवलं म्हणून मनमोहन यांच्यावर प्रचंड टीका झाली. पण ते कचरले नाहीत. सिंग यांचा निर्णय किती योग्य होता, हे नंतर विरोधकांनाही मान्य करावं लागलं. संकट आलं म्हणून रिझर्व्ह बँकेतील आपत्कालीन निधीला त्यांनी हात लावला नाही की अदानीना स्वाहा केला तसं देशातील उद्योग कोण्या उद्योगपतीला विकले नाहीत. याच काळापासून देशात उदारीकरणाचं वारं वाहू लागलं आणि भारतीय बाजारात परकीय गुंतवणुकीची नवी दारं उघडली गेली. याने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. जी कोणालाही रोखता आली नाही.
ढासळत्या अर्थव्यवस्थेने सार्यांना हुलकावणी दिली आणि जागतिक मंदीने सगळेच पाश्चात्य देश हेलकावे खावू लागले तेव्हा माझा देश स्वाभीमानाने आणि ताठ मानेने जगाचा आदर्श बनला होता. ही किमया एकट्या मनमोहन सिंग यांची होती. ते पंतप्रधान नसते तर हे होणं तर राहोच पण मोदींसारखे पंतप्रधान असते तर त्यांनी त्या संकटातही देशाला लुबाडलं असतं, जसं करोना काळात लुबाडलं. आपत्कालीन निधीची वासलात लावून मोदींनी तेही दाखवून दिलं. असा पंतप्रधान मनमोहन यांना रेनकोटची उपमा देतो आणि निर्लज्ज त्याची स्तुती करतात याची करावी तेवढी किंव कमीच. याच मोदींनी गुजरातच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी मनमोहन सरकारने पाकिस्तानची मदत घेतल्याचा बेछुट आरोप केला होता. जो सत्ता येऊनही मोदींना शाबित करता आला नाही. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात तर मोदींच्या जिभेला हाड राहिलं नव्हतं. तेव्हा मोदी सिंग यांना मौनीबाबा म्हणत. मार्च २०१३ मध्ये पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत मोदींनी सिंग यांना ‘नाईट वॉचमेन’ म्हणून संबोधलं. इतकी अवहेलना ज्या व्यक्तीने डॉ. सिंग यांची केली त्या व्यक्तीला जरी तो पंतप्रधान असला तरी डॉक्टरांना श्रध्दांजली वाहण्याचा अधिकार पोहोचत नाही.
देशातल्या गरीबाच्या हाताला १०० दिवसांचं काम देणारी मनरेगा असो की देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणार्या वॅट प्रणालीचा अवलंब. देशातल्या प्रत्येक नागरीकाला शिक्षणाचा मुलभूत अधिकार असो की माहितीचा अधिकार असो यातून देशातल्या जनतेला अधिकचे अधिकार देण्याचं उदार धोरण अवलंबून मनमोहन यांनी देशावर उपकारच केले. मनमोहन हे काही हाडाचे राजकारणी नव्हते. अपघाताने पंतप्रधान झाले म्हणून त्यांची देशसेवा किंचितही कमी पडली नाही. देशभक्तीची लेबलं लावून तमाशा करणार्यांना लाज वाटावी अशीच कौतुकास्पद कामगिरी डॉ. सिंग यांची होती. मनमोहन हयात असताना त्यांच्यावर टीका करणार्या मोदी-शहा यांच्याबरोबरच त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्री राहिलेल्या निर्मला सीतारमन यांच्या बुध्दीला गंज चढला होता. मनमोहन यांच्यासारखी मी मंत्री नाही, असं सांगणार्या या बाईंनी सिंग यांच्या धोरणांवर कायम टीका केली. पण सिंग यांच्या धोरणांमुळे देशाचं कोणतं नुकसान झालं हे मात्र या बाईंनी कधी सांगितलं नाही. ज्या बाईंना कांदा खात नाही म्हणून त्याचं महत्व नाही, त्या बाईंनी मनमोहन यांच्या धोरणावर बोलावं, याचं आश्चर्य जरूर आहे.
अशा मनमोहन यांच्या निधनानंतर तरी त्यांना मोदी-शहा यांची सत्ता न्याय देईल, अशी अपेक्षाही या दोघांनी फोल ठरवली. देशाच्या दिवंगत पंतप्रधानांच्या अंत्यविधी तसंच स्मारकासाठी राजघाट हे स्थान याआधीच निश्चित आहे. पी. व्ही. नरसिंहराव वगळता आजवरच्या सर्वच पंतप्रधानांची स्मारकं राजघाटावर आहेत. अर्थात प्रथेनुसार अत्यंविधीही तिथेच उरकण्याची परंपरा आहे. या प्रथेला मोदी-शहांच्या सरकारने झिडकारलं आणि सामान्यांना जिथे अग्नी दिला जातो त्या निगम बोधघाट इथे मनमोहन यांच्या पार्थीवावर अंत्यविधी करावा लागला. त्याआधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे स्वत: मोदींबरोबर बोलले. त्यांनी शहांशी बोलण्यास सांगितलं. शहांसोबत बोलणं होऊनही निद्रीस्त मनमोहन यांच्याबाबत सत्ताधार्यांनी नीच राजकारण केलं.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनीही सरकारच्या या राजकारणावर जोरदार प्रहार केले. सिंग यांच्या अंत्यविधीबाबत केलेलं नीच राजकारण पुढे त्यांच्या स्मारकाबाबतही सुरू झालं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकासाठी दोन एकरचा भूखंड वापरणार्या या सरकारने मनमोहन यांच्या स्मारकासाठी दोन मीटर जागा देण्यासही नकार दिला आहे. दूरदर्शनवरून अंत्ययात्रेचं प्रक्षेपण त्रोटक दाखवणं, खाजगी वाहिन्यांचा तर बहिष्कारच असणं.. हे सारं कोणी घडवलं? यावरून हे सत्ताधारी काय लायकीचे आहेत, हे लक्षात येतं. मनमोहन यांना जगातल्या बहुतांश राष्ट्रप्रमुखांनी भावपूर्ण अभिवादन केलं. जगाने ज्यांची प्रशंसा केली त्या नेत्याला विद्यमान सत्ताधार्यांच्या निर्लज्ज राजकारणाने कितीही नाकारलं तरी काही बिघडणार नाही. इतिहास मनमोहन यांच्या कर्तव्याची जरूर दखल घेईल.
(लेखकाशी संपर्क भ्रमणध्वनी – ८१६९१३५२५३)


