मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरशी संबंधित विविध प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले होते. या अनुषंगाने तांबे यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
तांबे यांनी या भेटीत पुन्हा एकदा संगमनेरशी संबंधित मागण्यांचा राज्यातील जनतेच्या हिताच्या प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मागण्या ऐकून घेत याविषयी सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वास दिला असल्याचे म्हटले आहे.
या प्रश्नांवर तांबे यांनी केली उपमुख्यमंत्र्यांची चर्चा…
📌 नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासह या महामार्गाच्या रेखांकनात संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करा.
📌 संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या घरात राहणाऱ्या २,५०० कुटुंबांना हक्काचं स्वमालकीचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करावी.
📌 संगमनेर रस्ते विकास प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देऊन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत प्रकल्पाच्या प्रस्तावित रकमेस मंजुरी द्यावी आणि शहराच्या विविध भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे.
📌 संगमनेर शहरातील सर्वच निवासी अनधिकृत बांधकामांवरील १००% शास्तीकर माफ करून ही सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी ठोस योजना आणावी.
📌 संगमनेर शहराचं नाव ज्या तीन नद्यांच्या संगम ठिकाणावरून पडले, त्या म्हाळुंगी, आढळा आणि प्रवरा या नद्यांच्या सुधार प्रकल्पासाठी संगमनेर नगरपालिकेने तयार केलेल्या ३५० कोटींच्या प्रस्तावास मान्यता द्यावी.
या विषयांवर तांबे यांनी उपमुख्यमंत्र्यांची सविस्तर चर्चा केली असल्याचे म्हटले आहे.

