संगमनेर – वडगाव पान (ता. संगमनेर) येथे असलेल्या मिळकती संदर्भात सुरू असलेल्या वादात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून येत्या २६ जानेवारीला कुटुंबीयांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संगमनेरमधील रहिवाशी गणेश अनंत रासने यांनी दिला आहे.
या संदर्भात दिलेल्या उपोषणाच्या नोटीसमध्ये रासने यांनी म्हटले आहे की, त्यांच्या मालकीची वडगाव पाण्याचे सर्वे नंबर १३/१ जुना सर्वे नंबर १३/१ (अ) क्षेत्र ०.६१ आर ही मिळकत असून या मिळकतीशी दुरान्वये कोणताही संबंध नसलेले जनार्दन साधू गायकवाड यांच्यासह अन्य काही जणांनी रासने यांच्या मालकीच्या मिळकतीत वहिवाटीस हरकत, अडथळा सुरू केला होता. तसेच दक्षिण उत्तर बांधून रासने यांच्या मालकीचे क्षेत्र त्यांच्या वहीतील समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे रासने यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे मोजणीसाठी अर्ज दिला होता.
रासने यांच्या अर्जाप्रमाणे सदर जमिनीची मोजणी होऊन मोजणी अंतिम जनार्दन गायकवाड यांच्यासह इतरांनी वरील मिळकतीमध्ये पूर्व बाजूने दक्षिण उत्तर दिशेला १७ आर क्षेत्रावर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ते अतिक्रमण काढून टाकण्यासाठी रासने यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत अतिक्रमण अर्ज दाखल केला होता. या अर्जाची देखील गुणवत्तेवर चौकशी होऊन उपविभागीय अधिकाऱ्यांनी १७ मार्च २०२३ रोजी निकाल देत वरील मिळकतीमध्ये केलेले अतिक्रमण निष्का शीत करून अतिक्रमणित क्षेत्राचा ताबा रासने यांना देण्यासंदर्भात समनापुरच्या मंडळ अधिकाऱ्यांना सुचित केले होते.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशावरून समनापुरच्या मंडळ अधिकाऱ्यांनी २५ एप्रिल २०२३ रोजी आदेशाची अंमलबजावणी करत मिळकतीमध्ये प्रत्यक्ष येऊन कार्यवाही सुरू केले असता वरील व्यक्तींनी संगमनेर न्यायालयाकडून मिळविलेला जैसे थे आदेश मंडळ अधिकाऱ्यांना दाखविला. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
दरम्यान न्यायालयाने वरील व्यक्तींचा स्टेटस को आदेश ३० मार्च २०२४ रोजी नामंजूर केल्याने रासने यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अतिक्रमण काढण्यासंदर्भातील आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. या अनुषंगाने मंडळ अधिकाऱ्यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी रासने यांना आदेशाची अंमलबजावणी करणार असल्याचे कळविले होते. मात्र या दिवशी मंडल अधिकारी वादातीत मिळकतीमध्ये फिरकलेच नाही. त्यांनी रासने यांना तहसील कार्यालयात बोलावून घेत तहसीलदार यांचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करणार असल्याचे पत्र दिले.
त्यामुळे रासने यांनी मंगळवारी (७ जानेवारी) मंडळ अधिकारी समनापुर यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याची विनंती केली असता त्यांनी रासने यांना कोणताही प्रतिसाद न देता पाहू करू अशी भूमिका घेऊन बोळवण केली. त्यामुळे मंडलाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याने प्रजासत्ताक दिनी कुटुंबीयांसह संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणास बसणार असल्याचे म्हटले आहे.


