संगमनेर – आपला सहकार, आपलं संगमनेरच जग, सहकाराचे विश्व तीर्थरूप भाऊसाहेबांनी मनापासून रक्ताचे पाणी करून वाढविल आहे. ते पुढच्या कालखंडात काळजीपूर्वक जपण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची आहे. हे लक्षात ठेवावे लागेल. काही मोडण्याचे प्रयत्न नक्की होतील. काही शक्ती असं काम करतील, पण त्यांना कोणत्याही पद्धतीचा थारा न देता आपल्याला हा सहकार, तालुका, राजकारण पुढे न्यायच आहे. त्याकरता तुम्ही सर्वांनी या स्मृतिदिनी भक्कमपणे निश्चित राहण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, असं आवाहन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
रविवारी संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात आयोजित स्वातंत्र्य सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात प्रेरणा दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत श्री शाहू छत्रपती महाराज, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, पुरस्कारार्थी माजी मंत्री राजेश टोपे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संभाजीराव कडू यांच्यासह शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, राजवर्धन, शरयू व जयश्री थोरात, रणजीतसिंह देशमुख, उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, दशरथ सावंत, मधुकर नवले, मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना थोरात म्हणाले, दरवर्षी ११, १२ जानेवारीला जयंती उत्सव साजरा केला जातो. मागील वर्ष भाऊसाहेबांच्या शताब्दीचे वर्ष होते. त्यानिमित्ताने गेल्या वर्षी मोठा कार्यक्रम झाला होता. जयंतीच्या स्मृती प्रित्यर्थ आपण दरवर्षी सन्मान आयोजित करत असतो. आज आपल्या जीवनात काही ऊनदून असेल. मात्र आज जो काही संगमनेर तालुका दिसतो, आपला कामगार, व्यापारी दिसतो ते यशवंतराव चव्हाण, डॉ. अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात यांना वजा करून नाही हे प्रथमतः लक्षात ठेवलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात हिरे वेचण्याच काम केलं. त्यात अण्णासाहेब आणि भाऊसाहेबांच नाव लागतं. अण्णासाहेब यांनी दिल्लीत गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीत ताकद देण्याचा काम केलं. म्हणून माळरानावरचा साखर कारखाना उभा राहिला. यशवंतराव चव्हाण आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या मदतीशिवाय हा कारखाना उभा राहू शकला नसता.
अण्णासाहेब शिंदे यांचे शेवटच्या क्षणापर्यंत देश महाराष्ट्र आणि संगमनेरला मार्गदर्शन लाभलं. भाऊसाहेबांनी सुरू केलेल्या दूध संघाला अण्णासाहेबांनी मार्गदर्शन केलं. अण्णासाहेबांसोबत आप्पासाहेब पवार, मनीभाई देसाई यांचे मार्गदर्शन होतं. संपूर्ण तालुक्यात आज त्यातून साडेनऊ लाख लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. हा एक चमत्कार आहे, हे सगळं कसं झालं असं जर विचारलं तर या विभूतींचे नाव आपल्याला घ्यावं लागेल. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. अंतकरणात ही नाव कोरण्याची गरज आहे. त्यांच्याविषयी ऋण व्यक्त केले पाहिजे. यातून दरवर्षी हा जयंती सोहळा साजरा होत असतो. या जयंती सोहळ्यात प्रत्येक वर्षी आपण काही सन्मान करत असतो.
पुरस्कारार्थी रावसाहेब कसबे हे तुमच्या आमच्या कुटुंबातील असून त्यांनी जे काही लिखाण केलं ते संगमनेरला असताना केलं, हे नाकारता येणार नाही. त्यांची पुस्तक गाजली आहे. दलित साहित्याच्या क्षेत्रात त्यांच्या झोत कादंबरीने क्रांती झाली. त्यांनी पुरोगामी विचाराला पुढे नेण्याच, जिवंत ठेवण्याचं, ताकद देण्याचे काम केलं आहे. पुरोगामी विचार हा आज महत्त्वाचा आहे. कसबे आपल्या कुटुंबातील असले तरी त्यांचा लौकिक आज महाराष्ट्रात नव्हे तर देश, जगात आहे.
वसंतदादा पवार शुगर इन्स्टिट्यूट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. ऊस, साखर धंद्याच्या क्षेत्रात आज ही संस्था केवळ महाराष्ट्राचीच नाही तर ही इन्स्टिट्यूट जागतिक पातळीवर काम करत आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये सर्व पक्षाचे लोक शरद पवारांनी ठेवले आहेत. मी देखील यात काम करतो. पवार साहेबांच्या विरोधातील लोक देखील या इन्स्टिट्यूटमध्ये आहे मात्र पवार साहेब कधीही त्यांच्या कामात परत दाखवत नाही.
राजेश टोपे यांचे कोरोना काळातील काम आदर्श आरोग्य मंत्री कसा असतो हे सर्वांनी पाहिले आहे. कोरोनात ते लोकांमध्ये जात होते. आमच्या सरकारच काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काम मार्गदर्शक म्हणून आदर्श झालं. महसूल मंत्री म्हणून मी देखील सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असायचो. फील्डवर जात औषधांची काळजी राजेश टोपे यांनी घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील सहकारी साखर कारखाना राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दरवर्षी २६ लाख मेट्रिक टन ऊस निर्मिती होत असते हे या कारखान्याचे वैशिष्ट्य आहे. वडिलांची परंपरा पुढे नेण्याचे काम ते करत आहे अशा शब्दात थोरात यांनी यावेळी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला.

