मुंबई – मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी संदर्भात महायुतीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी मोठ वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधी सरकारने बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आता सुमारे ६० लाख महिलांचे या योजनेतील अर्ज बाद होण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री भुजबळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र असलेल्या महिलांना स्वतःहून नावे मागे घेण्यास सांगितले होते. जर बहिणींनी स्वतःहून या योजनेतून नाव काढले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही भुजबळ यांनी म्हटले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेत अपात्र बहिणींवर कारवाई होणार असल्याच्या चर्चांना वेग आला असतानाच सरकारमधील व सरकार बाहेरील नेत्यांच्या वक्तव्यामुळे ही योजना संकटात असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान या योजनेतील ६० लाख महिलांच्या अर्ज बाद होणार असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
योजनेतून बाद होणाऱ्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यामुळे नव्या वर्षात आता सरकारचे संक्रांत लाडक्या बहिणींवर येणार असल्याचे दिसत आहे.
दरम्यान या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना आमच्या सरकार सुरू ठेवणार आहे. या योजनेत जर कोणी नियमाच्या बाहेर जाऊन पैसे घेतले असतील तर त्यांचे अर्ज बाद केले जाऊ शकतात.
यामुळे आता लाडक्या बहिणींवर संक्रांत येणार असल्याचे सांगितले जात असून ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. महिलांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याने या निकषांत बाहेर जाऊन जर महिला सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे देखील बोलले जाते.

