जामखेड – शहरालगत असणाऱ्या जांबवडी रस्त्यावर बुधवारी भीषण अपघात घडला आहे. या अपघातात बोलेरो वाहन रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अशोक विठ्ठल शेळके (वय २९), रामहरी गंगाधर शेळके (वय ३५), किशोर मोहन पवार (वय ३०), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय २५) अशी ह्या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे चौघेही अपघातग्रस्त बोलेरोमधून प्रवास करत होते.
अपघातग्रस्त बोलेरो जांबवडी गावाच्या दिशेने जामखेडकडे येत असताना रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खडीवरून गेल्याने बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बोलेरो गाडी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली. या घटनेमुळे अपघातस्थळी एकच खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी तत्काळ घटनास्थळी आपली रुग्णवाहिका घेऊन धाव घेतली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांना विहिरीतून बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने या अपघातात उपचारापूर्वीच चार जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी घोषित केले.
या घटनेने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या दुर्घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी प्रशासनाकडे तक्रार करत रस्त्यांच्या कामासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.
खडीवरुन घसरली अन् बोलेरो विहिरीत पडली; चौघांचा मृत्यू
अशोक विठ्ठल शेळके (वय २९), रामहरी गंगाधर शेळके (वय ३५), किशोर मोहन पवार (वय ३०), चक्रपाणी सुनील बारस्कर (वय २५) अशी ह्या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहे. हे चौघेही अपघातग्रस्त बोलेरोमधून प्रवास करत होते.

