संगमनेर – राज्यात बिबट्यांची संख्या वाढत असून त्यांचे मानवी वस्तीवरील हल्ले चिंतेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली होती. त्यासंदर्भातील निवेदनदेखील त्यांनी सरकारला दिले होते. बिबट्यांच्या नसबंदीबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागत असल्याने तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी १४ जानेवारीला पत्रकार परिषदेत सांगितले.
ऊस तोडल्यानंतर बिबट्यांचा अधिवास संपतो आणि ते मानवी वस्तीत जातात. मग मानवी वस्तीतील कुत्रे, शेतात काम करणारे शेतकरी यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार घडतात. आमदार सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत पत्र दिले आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी नसबंदी हा एक उपाय आहे. त्यासाठी गरज पडल्यास केंद्रीय मंत्र्यांशी चर्चाही करू, असे वनमंत्री नाईक म्हणाले.
https://x.com/satyajeettambe/status/1879206050823381513?t=PZfQ8SDHLzszQp0lgDbkgg&s=19
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेताला पाणी देण्यासाठी रात्री वीजपुरवठा केला जातो. बिबट्यांचा वावर असणाऱ्या क्षेत्रात शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला तर बिबट्यांचे हल्ले रोखता येतील. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बिबट्यांचा वावर असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि घरासाठी कुंपण करण्यासाठी अनुदान देण्याची मागणी आ. तांबे यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती.
राज्यातील अनेक वनक्षेत्रामध्ये बिबट्यांचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. याच संदर्भात आ. तांबेंनी जून २०२४ मध्ये केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली होती. या भेटीत केंद्र शासनाने बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी देण्याची मागणी आ. तांबेंनी केली होती. परंतु राज्य शासनाने याबाबतचा प्रस्ताव पाठविल्यास केंद्र शासन त्याबाबतचा सकारात्मक विचार करून मंजुरी देण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
वर्षभरात १३ वाघांचा मृत्यू
मार्च २०२३ ते मार्च २०२४ मध्ये २६ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. मार्च २०२४ पासून आतापर्यंत १३ वाघ व बिबट्या मृतावस्थेत आढळले. कधी शिकार करून तर कधी विजेच्या तारा, दोन जनावरांमधील झुंजीमुळेही मृत्यू झाले आहेत.
धन्यवाद, वनमंत्री मा. गणेश नाईक साहेब!
आपण माझ्या मागणीची दखल घेतली. मात्र आता वेळ आली आहे तातडीने कार्यवाही करण्याची. मानवी वस्तीवरील बिबट्यांचे वाढते हल्ले पाहता आपण तातडीने केंद्रीय वनमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करावा व बिबट्यांच्या नसबंदीबाबत लवकरात लवकर धोरण राबवावे, ही नम्र विनंती. – आमदार सत्यजित तांबे.



