माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा लौकिक देशपातळीवर!
संगमनेर – संगमनेरमधील सहकारमहर्षी चषकातून आयपीएलसह देशपातळीवरचे अनेक खेळाडू तयार होतील, असा विश्वास स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनी व्यक्त केला.
राज्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्वात गौरवशाली ठरलेल्या सहकार महर्षी T-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या एस आर एस संघाने 277 धावांचे मोठे आव्हान उभे करून पुण्याच्या पुनीत बालन संघाचा 37 धावांनी पराभव करून मानाचा सहकार महर्षी चषक पटकावला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या 25 व्या वर्षातील क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आयोजक आमदार सत्यजित तांबे, युवा नेते राजवर्धन थोरात, मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी रामहरी कातोरे, के. के. थोरात, महेश मयूर, राजेंद्र काजळे, नितीन हासे, सुधाकर जोशी कल्पेश मेहता, ॲड. सुहास आहेर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
अजिंक्य रहाणे म्हणाले, संगमनेरमध्ये आल्यावर मला मोठी ऊर्जा मिळते. आमदार सत्यजित तांबे तालुकास्तरावर सातत्याने 25 वर्ष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत असून हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. यामुळे अनेक तरुणांना मोठी संधी मिळत असून याच स्पर्धांमधून उद्याचे आयपीएल किंवा देश पातळीवरचे खेळाडू मिळणार आहेत.
संगमनेरला मी नेहमी प्राधान्य दिले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे सातत्यपूर्ण केलेल्या विकास कामांमुळे संगमनेरमध्ये खूप बदल झाला आहे. आणि त्यामुळे संगमनेरचा लौकिक देश पातळीवर झाला आहे. संगमनेरमध्ये माझ्या लहानपणच्या खूप आठवणी आहेत. मला संगमनेरमध्ये येऊन खेळायला नक्की आवडेल. तरुणांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल असे सांगताना येत्या काही दिवसांमध्ये संगमनेरमध्ये क्रिकेट अकॅडमी सुरू करू असेही ते म्हणाले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, तालुक्याचा भूमिपुत्र आणि गौरव असलेले अजिंक्य रहाणे यांनी संगमनेरचा लौकिक जागतिक पातळीवर नेला आहे. सतत पंचवीस वर्षे सुरू असलेली संगमनेरची ही स्पर्धा आता राज्यातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे. या स्पर्धेतून अनेक मोठे खेळाडू तयार होणार असून खेळामध्ये हार-जीत होतच असते. मात्र खेळामधून करिअर होत असल्याने तरुणांनी मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे.
सत्यजित तांबे म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमधील तरुणांना संधी मिळावी याकरता सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. संगमनेरमध्ये चांगले क्रीडा संकुल व्हावे याकरता स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकी संघाची एक एकर जागा मोफत दिली. आगामी काळामध्ये पूर्ण वेळ क्रिकेट अकादमी या ठिकाणी सुरू होणार असून स्टेडियमची क्षमता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.
मानाचा सहकार महर्षी चषक देऊन एस आर एस मुंबई संघाला गौरविण्यात आले. 20 षटकांमध्ये मुंबई संघाने 277 धावा केल्या. आयपीएल खेळाडू समर्थ व्यास यांनी 23 चेंडूंमध्ये 76 धावा फटकावल्या तर रणजी खेळाडू सचिन यादव याने 26 चेंडूंमध्ये 67 धावा केल्या. याचबरोबर मुंबईच्या राकेश प्रभू याने तीन शतकांमध्ये चार बळी मिळवत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून हर्ष सांगवी याला गौरवण्यात आले तर उत्कृष्ट बॉलर म्हणून मुंबई सेंट्रलचा विशाल हर्ष याला सन्मानित करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे 2 लाख 1 हजार रुपये बक्षीस व सन्मानचिन्ह मुंबईच्या एस आर एस संघाने पटकावले. तर द्वितीय क्रमांकाचे 1 लाख 31 हजार रुपयांचे बक्षीस पुण्याच्या पुनीत बालन संघाने पटकावले. तृतीय क्रमांकाचे 71 हजार रुपयांचे बक्षीस गेम चेंजर पुणे संघाने पटकावले तर चतुर्थ क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे बक्षीस सेंट्रल रेल्वे संघाने पटकावले.
मैदानावर आतिषबाजी… विजेत्या संघाने 2 लाख रुपयांचे बक्षीस जिंकल्यानंतर मैदानावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. सुमारे दहा हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अजिंक्य रहाणे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती आणि त्यांनी थेट साधलेला संवाद याचबरोबर ग्राउंड मनचा केलेला सत्कार हे या कार्यक्रमाचे मोठे वैशिष्ट्य ठरले.


