छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी १ कोटीच्या निधीची पालकमंत्री विखे पाटलांची घोषणा खोटी ठरली, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
निधीसाठी आमदार सत्यजित तांबे यांचा पाठपुरावा तर विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या भूमिकेकडे लक्ष!



तांबे यांनी बैठकीत घोषणा केल्याप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने एक कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. मात्र जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी तांबे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असा निधी देता येत नाही त्यावर काय उपाय करता येईल याबाबत आम्ही सरकारकडे मार्गदर्शन मागितले आहे.
नगर परिषदेच्यावतीने यासाठी निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी यासाठी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे २१ ऑगस्ट २०२३ रोजी संगमनेर बस स्थानकावरील एसटी महामंडळाची जागा नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासंबंधीच्या सूचना परिवहन मंडळाला दिल्या होत्या.
दरम्यान तांबे यांचा पाठपुरावा सुरू असतानाच तत्कालीन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १६ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये देण्याचे घोषणा केली होती. पालकमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेत एक कोटी रुपयांची घोषणा केल्याने पालिकेचा प्रस्ताव मागे पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एक कोटी रुपये आणि पुतळ्यासाठीची जागा निश्चित झाल्याने संगमनेरकर आनंदित झाले होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या प्रमुखपदी अमोल खताळ यांची नियुक्ती केली होती.
