राजकीय हेतूने काम बंद ठेवल्याचा आरोप… चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करा अन्यथा करणार आत्मदहन : सरपंच भाऊराव राहणे
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध गावांसाठी असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांसाठी सुमारे ८०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला.


याबाबत चंदनापुरीचे सरपंच भाऊराव राहणे, यांनी ज्येष्ठ नेते आर. बी. राहणे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत उपसरपंच हौसाबाई कढने, लक्ष्मी राहणे, मंगल वाकचौरे, सुरेखा काळे, शंकरराव रहाणे, सीमाताई भालेराव, गोरख सातपुते, किरण राहणे, राजेंद्र भालेराव, विद्याताई राहणे, रंगनाथ खर्डे, हिवरगाव पावसाचे सरपंच सुभाष गडाख, झोळेचे माधव वाळे, दत्तू गोफने आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध गावांसाठी असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांसाठी सुमारे ८०० कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या अंतर्गत चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा ही तीन गावे आदर्श ग्रामीण पाणीपुरवठा योजनेमधून जोडली जाणार आहेत. काही लोकांनी राजकीय हेतू ठेवून ही कामे बंद ठेवली आहे.
याचबरोबर झोळे येथील साठवण तलावाचे काम जवळजवळ वीस दिवसांपासून बंद आहे. याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासनाने कुठलीही ठोस पावले उचललेली नाही. प्रशासनाकडून होणाऱ्या या हलगर्जीपणाबाबत नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाला जाब विचारला आहे. मात्र तरीही राजकीय उद्देश ठेवून हे काम बंद पाडले आहे.
त्यामुळे शुक्रवारपर्यंत (१४ फेब्रुवारी) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने हे काम सुरू न केल्यास आत्मदहन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची राहील, असा खणखणीत इशारा चंदनापुरी, झोळे व हिवरगाव पावसा आदर्श ग्राम पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष तथा चंदनापुरीचे सरपंच भाऊराव रहाणे यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, उपविभागीय कार्यालय, पोलीस प्रशासन, तहसील कार्यालय यांनाही निवेदन दिले आहे.