मुख्यमंत्री फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना दुहेरी धक्का, एसटी महामंडळानंतर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातूनही शिंदे गट दूर
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हा धक्का मानला जातोय. आपत्ती व्यवस्थापनातून शिंदेंना वगळण्यात आल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


विशेष प्रतिनिधी / मुंबई
जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुराच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र, आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत काही सुधारणा करण्यात आल्यात. यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वगळ्यात आलंय.
त्यामुळं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला हा धक्का मानला जातोय. आपत्ती व्यवस्थापनातून शिंदेंना वगळण्यात आल्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात असून, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, एकीकडे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलण्यात आलं असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. महायुती सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू होती.
मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे शेवटपर्यंत आग्रही असल्याचे बोललं जात होतं. पण त्यांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळं महायुतीत शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. यातच आता शिंदेंना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत डावलण्यात आल्यामुळं फडणवीसांचा शिंदेंना धक्का मानला जातोय. या निर्णयामुळं शिंदे गट नाराज झाल्याची चर्चा आहे.
