मुंबई, दि. ११ फेब्रुवारी –
गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्क्यावर धक्के दिले जात आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याची माहिती समोर आली आहे.
लाडक्या बहिणींना द्यावयाच्या प्रत्येकी दीड हजार रुपयांनी सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडल्याने आता हा ताण कमी करण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’, ‘शिवभोजन थाळी’ आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबविण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदेंनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. ‘आनंदाचा शिधा’ही योजना देखील थांबवण्याचा फडणवीस सरकारचा विचार करत आहे. तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं मोफत योजना थांबवण्याचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ‘शिवभोजन थाळी’ योजनाही बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.
एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरुनही वगळले – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरुनही वगळण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहे. मात्र नगरविकास मंत्री असून एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळले आहे. महसूल,मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री समितीवर आहेत. मुंबईतल्या जुलै २००५ च्या महापुरानंतर आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना करण्यात आली होती. 



