विशेष प्रतिनिधी / मुंबई
अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईने संकटात सापडलेले शिवसेनेचे कोकणचे कट्टर सैनिक राजन साळवी यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकला. मात्र हे करताना त्यांनी एसीबी कारवाईविषयी ब्र न काढता पक्ष सोडण्याला विनायक राऊत कारणीभूत असल्याचं सांगत आपली कातडी वाचवली आहे. सुमारे चार कोटीच्या बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचं निमित्त करत एसीबीने त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवरही कारवाईची टांगती तलवार उगारली होती.
एकीकडे बेहिशेबी मालमत्तेचं प्रकरण डोक्यावर असताना विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राजन साळवी गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. याच कारणामुळे ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. अशातच त्यांनी बुधवारी पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा देत ठाकरेंची साथ सोडली.
यानंतर आज (१३ फेब्रुवारी) ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करते झाले. या पक्षप्रवेशाआधी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजन साळवी म्हणाले की, गेले ३८ वर्ष मी रत्नागिरीमध्ये जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक आहे. त्यामुळे २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे. कारण या निवडणुकीत माझ्या पक्षातील नेत्यांनीच माझ्या विरुद्ध काम केले.
खरं तर विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे. कारण विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं, असा गंभीर आरोप राजन साळवी यांनी केला आहे.
सामंत बंधूंविरोधातील वादावर बोलताना राजन साळवी म्हणाले की, त्यांच्याबरोबर आता माझी समेट झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना समजवून सांगितलं की, शिवसेना आपल्याला वाढवायची आहे. त्यामुळे आता आमच्यातील वाद मिटले आहेत. माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर, मला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल, असं मी आधीच बोललो होतो. त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे, असं साळवी म्हणाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईसंदर्भात बोलताना राजन साळवी म्हणाले, कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही. तेव्हाही मी घाबरलो नाही आणि आताही घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेन. कारण मला खात्री आहे मी निर्दोष आहे.
जेव्हा निवडणूका होत असतात तेव्हा आरोप होत असतात, असेही राजन साळवी म्हणाले.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक करून असलेले उदय सामंत यांना चाप बसवण्यासाठी शिंदे यांना पर्याय हवा होता. तो साळवी यांच्या रूपाने मिळाल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाली आहे. साळवी यांना पक्षात प्रवेश देत असल्याने कोकणातील सामंत बंधूच्या वर्चस्वालाच धक्का दिला जात असल्याचं उघडपणे बोललं जात आहे.
बुधवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उदय सामंत, किरण सामंत आणि राजन साळवी यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी सामंत बंधू आणि राजन साळवी यांच्यातील अंतर्गत वाट मिटवून या दोघांमध्ये समेट घडवून आणला. ही बैठक तब्बल दोन तास सुरू होती. या बैठकीनंतर किरण सामंत आणि राजन साळवी हे एकाच गाडीतून बाहेर पडल्याचं पाहायला मिळालं.
राजन साळवी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे. हा शिवसेना ठाकरे गटाला धक्का असल्याचं मानलं जातं. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना, कोणी पक्ष सोडल्यामुळे शिवसेनेची (ठाकरे) ताकद कमी होणार नाही. राजन साळवी हे गेल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला फार काही फरक पडणार नाही, असं म्हटलं.
दानवे यांना राजन साळवी यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, राजन साळवी यांचा पराभव झाला नसता तर ते गेले असते का? निवडणुकीत जय–पराजय होतच असतात. हा जय-पराजय अंतिम नसतो. या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे. आमच्या शिवसेनेने एकाचवेळी ४० आमदार गेलेले पाहिलेत, एक माजी आमदार गेला म्हणून काय मोठा फरक पडणार आहे, असं दानवे म्हणाले.

