विशेष प्रतिनिधी / मुंबई
शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली आहे. शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारीच नाही तर बडे नेतेही ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आहेत. कोकणातील उद्धव ठाकरेंचे निष्ठावान माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर मराठवाड्यातील नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. शिवसैनिक उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून का जात आहे, याचे उत्तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे.
दानवे यांनी कोणाचे नाव न घेता म्हटले की, समोरचे लोक बाजार मांडून बसले आहेत. पैशांची ऑफर देत आहेत. विकास कामांची ऑफर दिली जात आहे. सर्रास खरेदी-विक्रीचा व्यवहार केला जात आहे. या सगळ्या लोकांनी बाजार मांडला आहे. जे बाजारात मांडलेले आहेत ते लोक जात आहेत. त्याचे आम्हाला दुःख नाही. फक्त खरेदी-विक्री होत नाही, तर ब्लॅकमेलिंग देखील केले जात आहे. असाही आरोप अंबादास दानवे यांनी केला.
ऑपरेशन टायगर थांबणार नाही, एक खासदारही आमच्या संपर्कात असल्याचे शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. त्यासंबंधी बीड जिल्ह्यातील परळी येथील आमदार धनंजय मुंडेंवर विरोधी पक्षांकडून आणि सत्ताधारी महायुतीच्या काही नेत्यांकडूनही वारंवार हल्ला होतोय. दानवे म्हणाले की, योगेश कदम यांना अजून काही माहित नाही. त्यांना शिवसेना संघटना काय आहे हेही माहीत नाही. बापाच्या बळावर आमदार होणं सोपं असतं. पण संघटना उभी करणं अवघड आहे. फक्त घोषणा करणे, वल्गना करणारे खूप आले आणि गेले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना तळपत्या तलवारीसारखी येत्या काळात तळपताना दिसेल, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.
फडणवीसांच्या सपत्नीक कुंभ स्नानावरुन दानवेंनी घेतला चिमटा… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयागराज येथे पोहोचले आहेत. ते कुंभमेळ्यात जाणार आहेत. यावरुन विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री कुंभमेळ्याला जाणार याचा अर्थ त्यांनी बरीच पापं केलेली आहेत. केलेलं पाप धुण्यासाठी ते चालले असतील. त्यांच्या कुंभमेळा दौऱ्यावर काय बोलायचे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले होते की, हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला. कृषीमंत्री कोकाटे यांच्या या वाक्याचा दानवे यांनी समाचार घेतला. दानवे म्हणाले, कृषीमंत्री शेतकऱ्यांना भिकाऱ्यांची उपमा देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो त्यांच्याबद्दल अशी भाषा शोभणारी नाही. शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देवून सरकार उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर त्यांचे राज्य चालले आहे. या सरकारने शेतकऱ्यांच्या अनेक अनुदान योजना थांबवल्या आहेत, असाही आरोप दानवे यांनी केला.


