
संगमनेर –
आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये झालेल्या “आय लव संगमनेर चळवळ” अंतर्गत युथोत्सव नोकरी मेळाव्यात जिल्हाभरातून ७२९० तरुणांनी सहभाग नोंदवला. या नोकरी मेळाव्यात सहभागी झालेल्या ९१ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून २०१९ विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड झाली आहे. 
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात आय लव संगमनेर लोक चळवळीच्यावतीने आयोजित युथोत्सव नोकरी मेळावा रविवारी पार पडला. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आयोजक आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, हर्ष मालपाणी, प्रज्वल भळगट, किरण रहाणे आदींसह विविध कंपन्यांचे एच आर मॅनेजर यावेळी उपस्थित होते.
या नोकरी मेळाव्यात, कॅम्पस इंटरव्यू, रोजगार, व्यवसाय मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संगमनेर तालुक्यासह जिल्हाभरातील ७२९० युवक व युवतींनी सहभाग नोंदवला. टाटा, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटी कंपन्या यांच्यासह एकूण ९१ कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते.
यावेळी युवकांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इंटरव्यू देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधून २०१९ विद्यार्थ्यांची थेट निवड झाली असल्याने सर्व तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
नोकरीसाठी वर्षभर स्वतंत्र विभाग कार्यरत… टीसीएस, टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा अशा विविध ९१ कंपन्यांमधून विद्यार्थ्यांना थेट नोकरीची संधी मिळली आहे. मेळाव्यासाठी बीए, बीकॉम, बीएससी, इंजीनियरिंग, फार्मसी, आयटीआय, डिप्लोमा अशा विविध क्षेत्रांमधील सात हजारावर विद्यार्थी उपस्थित होते. यापुढील काळात बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत केला जाईल, असे आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांना करिअरमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि नोकरी मिळून देण्यासाठी अत्यंत चांगला उपक्रम आयोजित केला आहे. ज्यांच्यामध्ये गुणवत्ता आहे. ज्यांच्याकडे चांगले शिक्षण आहे. त्यांना ही चांगली संधी आहे. गुणवत्तेला मोठे महत्त्व असून ज्या विद्यार्थ्यांची किंवा तरुणांची निवड होईल. त्यांना काही कंपन्या प्रशिक्षण देतील. ती तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे. याच बरोबर जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची मानसिकता ठेवली तर नक्कीच यश मिळणार आहे. ग्लोबलायझेशनमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे गुणवत्ताधारक युवकांना जगभरात मोठी संधी आहे. आणि ती संधी उपलब्ध करून देण्याचे काम या नोकरी मेळाव्यातून करण्यात आले आहे. यापुढेही तरुणांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येतील. – बाळासाहेब थोरात, माजी मंत्री.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यामध्ये शिक्षणासह अत्यंत चांगल्या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या आहे. आज या मेळाव्यात जिल्हाभरातून सात हजार पेक्षा जास्त युवक सहभागी झाले असून त्या सर्वांना नोकरी मिळून देण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येकाने चांगली मानसिकता ठेवावी. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. ज्या विद्यार्थ्यांची निवड होणार नाही, त्यांच्याकरता प्रशिक्षण देऊन पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न केले. जातील. यापुढील काळातही जगभरातील विविध कंपन्या संगमनेरमध्ये आणून विद्यार्थ्यांना नोकरीसाठी संधी उपलब्ध करून दिली जाईल. – सत्यजित तांबे, आमदार.

संगमनेर हे शैक्षणिक हब झाले आहे. नाशिक, पुणे, मुंबई या मेट्रो शहरांच्या जवळ संगमनेर असल्याने विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्याना येथे बोलावून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या प्रयत्न हा अत्यंत कौतुकास्पद आहे. – डॉ. जयश्री थोरात.

