संगमनेर दि. २० फेब्रुवारी – अनंत पांगारकर
मृत्यूनंतर माणसाचा शेवटचा प्रवास किमान सुखकर व्हावा अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते. मात्र मृत्यूनंतर त्याचे क्रिया कर्म करण्यासाठी जाणाऱ्यांना देखील मोठी कसरत करावे लागत असल्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला आहे. परिसरातील नागरिकांना दशक्रिया विधीसाठी प्रवरा संगमावर असलेल्या शांती घाटावर जाण्यासाठी गटारगंगा ओलांडून जावे लागत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
प्रवरा आणि म्हाळुंगी नदीच्या संगमावर संगमनेर नगर परिषदेने दशक्रिया विधीसाठी शांती घाट बांधला आहे. शहरालगतच्या सुकेवाडी, पावबाकी, पोखरी हवेली, खांजापूर, समनापुर आदी ग्रामीण भागातून येथे नागरिक मोठ्या प्रमाणात दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येत असतात.
नगरपरिषदेने बांधलेल्या शांती घाटावर दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाही. शांती घाटावर छतही नसल्याने उन्हातच सर्व विधी उरकावे लागत आहे. तसेच या परिसरात सावलीची कोणतीही व्यवस्था नाही. सर्वात गंभीर बाब म्हणजे या संगमावर किंवा शांती घाटाकडे जाण्यासाठी योग्य रस्ता देखील उपलब्ध नसल्याने नागरिकांना गटारीच्या पाण्यातून जावे लागते. शहरातील सांडपाणी या गटारीच्या माध्यमातून म्हाळुंगी नदीपात्रात व तेथून प्रवरा नदीपात्रात जाते.
शहराच्या या गटारगंगेतून जाताना नागरिक नगर परिषदेचा सातत्याने उद्धार करताना दिसतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून प्रचंड ऊन असल्याने सकाळच्या वेळी देखील नागरिकांना येथे बसणे असह्य होते. दशक्रिया विधीसाठी आलेल्या पुरुष आणि महिलांना ओले कपडे बदलण्यासाठी देखील येथे कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच नदीला पाणी नसल्यानंतर या ठिकाणी पाण्याची कोणतीही व्यवस्था नसते.
पाण्याच्या व्यवस्थेसाठी नगरपरिषदेने या ठिकाणी एखादा बोअर मारून पाण्याची उपलब्धता करून देण्याची गरज आहे. तसेच सावलीसाठी छत बांधण्याची आवश्यकता असून ज्या गटारगंगेतून नागरिकांना चालत जावे लागते ते गटारीचे पाणी देखील इतरत्र वळविण्याची आवश्यकता आहे.
सध्या नगर परिषदेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने मुख्याधिकारी तथा प्रशासक असलेले रामदास कोकरे या संदर्भात कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.


