संगमनेर, दि. २० फेब्रुवारी –
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर महसूल प्रशासनाने कोणालाही विश्वासात न घेता परस्पर आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविल्यानंतर नव्याने होऊ घातलेल्या अपर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील गावावरून संगमनेर तालुक्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृती समित्यांच्या आक्रमकतेनंतर सत्ताधारी नरमले असून तालुक्यातील महसूल मंडळाचे जनतेच्या दबावानंतर फेररचना होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही परिस्थितीत संगमनेर तालुक्याचे मोडतोड होऊ दिली जाणार नसल्याचा इशारा प्रशासनारा दिला होता. तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील यासाठी मंत्रालयात पाठपुरावा केला. नव्या तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अनेक गावांनी या प्रस्तावाला विरोध दाखवत आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला.
आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाच्या फेररचनेमध्ये संगमनेर शहराजवळील अनेक गावे जोडली आहेत. समनापुर व संगमनेर खुर्द महसूल मंडळ त्यामध्ये समाविष्ट केले आहेत. यामुळे ६२ गावांमधील नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. सत्ताधाऱ्यांनी संगमनेर तालुका मोडण्याचा कुटील डाव आखला होता, मात्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक इशारा दिला. याचबरोबर जनता ही रस्त्यावर उतरली. कृती समितीने आंदोलन केले. तालुका बचाव कृती समिती आणि तालुक्यातील ६२ गावांमधील जनता या निर्णयाविरोधात एकवटली.
वेळोवेळी निदर्शने केली निवेदन दिली आणि उपोषण व आत्मदहनाचा इशाराही दिला. याचबरोबर प्रशासकीय पातळीवर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला आमदार सत्यजित तांबे ही मंत्रालयात महसूल मंत्री यांची भेट घेतली. कृती समितीने न्यायालयीन लढा लढण्याचा इशारा दिला. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी माघार घेत आता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय आश्वी येथे अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव होणार नाही असे सांगितलं आहे.
संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक परिवार म्हणून आहे हा तालुका एकवटला असून आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयास संगमनेर तालुक्यातील जनतेने आणि नागरिकांनी कडाडून विरोध केला असल्याचे माजी मंत्री थोरात यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने म्हटले आहे.

