Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख… छत्रपती शिवरायांवरील बेगडी प्रेमाचा उमाळा!
विश्लेषण

रविवार विशेष लेख… छत्रपती शिवरायांवरील बेगडी प्रेमाचा उमाळा!

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरFebruary 23, 2025No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

          हिंदवी स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवरायांचे आपणच जणू कर्तेधर्ते आहोत, अशा तोर्‍यात भाजपचे नेते छत्रपतींचे आज पोपटासारखे गुणगाण करत आहेत. शिवरायांवर आपलाच तेवढा अधिकार असल्याची भाजपची मस्ती अजून उतरलेली दिसत नाही. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ट्विटवर टीका करताना भाजपच्या नेत्यांनी कंबरेचंही सोडलं. आपल्या टीकेला जनाधार नाही, हे लक्षात असूनही त्या पक्षाचे नेते स्वत:ला आवरू शकत नाहीत, याचं आश्‍चर्य वाटतं. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी श्रध्दांजली अर्पण केल्याचं ट्विटचं निमित्त करत भाजपच्या काही नेत्यांनी जिभेवर येईल ती टीका केली. भाजपशी आणि त्या पक्षाची पालकसंस्था असलेल्या संघाशी अर्थाअर्थी संबंध नसलेले नेतेच बडबड करत होते. कोणी राहुल गांधी यांना बालबुध्दीचे नेते गणलं तर कोणी त्यांची अक्कल काढली आणि मुर्खही संबोधलं. गैर संधीचं सोनं करायला निघालेल्या या नेत्यांचा चक्क खंडेराव झाला. तोंडावर आपटावं अशी स्थिती झाली आणि केलेल्या टीकेचे उलटे बाण झेलण्याची आफत या नेत्यांवर ओढावली. 

राज्याच्या विधानपरिषदेत जवळपास साडेतीन वर्षं विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी सांभाळणारे प्रवीण दरेकर यांची विरोधकांवर टीका करण्याची हौस तर अजबच. याआधीही त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केलेल्या टीकेचं अनेकदा हसं झालं. आपल्या बोलण्यातून नवा वाद उद्भवतो, तेव्हा आपण समजदारीने बोललं पाहिजे, इतकी जाणीवही या नेत्याला राहिलेली दिसत नाही. या नेत्याने राहुल गांधी यांना मुर्ख माणूस असल्याचं म्हटलं. प्रचंड सत्तेला लोकसभेत लगाम घालणारा विरोधी पक्षाचा नेता हा दरेकरांच्या नजरेत मुर्ख असणं काही वेगळी गोष्ट नाही. दरेकर स्वयंभू आहेत. त्यांच्यावर टीका करावी असं एकही अवगूण त्यांच्यात नसल्याने ते इतरांवरच अनेकदा टीका करत असतात. एक पैचाही भ्रष्टाचार त्यांच्या नावावर नसल्याने, मजूर सोसायटीच्या बोगसपणातून बँकेची निवडणूक लढवण्याचा प्रताप त्यांच्या नावावर नसल्याने आणि बँकेत भ्रष्टाचाराची गंगोत्री वाहत नसल्याची चौकशी नको म्हणून भाजपत प्रवेश केला नाही, असं सांगणार्‍या दरेकरांचा चेहरा राज्यातल्या जनतेला चांगला ठावूक आहे. तेव्हा त्यांच्या म्हणण्याला फारसं मनावरही कोण घेत नाही. दुसरे नेते आणि राज्याचे नवे बंदरमंत्री नितेश राणे यांच्या जिभेला आकार नसल्यागत ते बोलत असतात. या निमित्त त्यांनी हिरवे साप, औरंग्यांची अवलाद असले शब्द वापरत आपली इच्छा भागवून घेतली. मंत्री झाल्यापासून राणे काय काय बडबडतात याची जंत्री काढली तर राणेंच्या म्हणण्याला कोणी किती मनावर घ्यावं, हा प्रश्‍नच आहे.

राहुल गांधी यांनी शिवरायांच्या जयंतीला श्रध्दांजली अर्पिली ही गोष्ट गैर होती यात वाद नाही. तिचं कोणीही समर्थन करणार नाही. मात्र हा जाणीवपूर्वक प्रकार झाला अशी आवई उठवणार्‍या भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपतींना वाहिलेली श्रध्दांजली जाणून घ्यावी. मोदी हे तर देशाचे पंतप्रधान. देशातल्या सार्‍या यंत्रणा त्यांच्यासाठी हात धुवून तयार. त्यामानाने विरोधी पक्षनेते पद देऊनही राहुल गांधी यांच्यापुढच्या सरकारकृत अडचणी काही कमी नाहीत. पंतप्रधानांसाठी सारं काही उपलब्ध असताना १९ फेब्रुवारी हा छत्रपती शिवरायांचा जन्मदिन आहे, याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला नसावी? हे पंतप्रधानांचं कार्यालय आहे की आणखी कोणाचं? चुकीच्या माहितीच्या आधारे पंतप्रधानांनी वाहिलेली श्रध्दांजली जशी जाणीवेने नव्हती तशी राहुल यांनी वाहिलेल्या श्रध्दांजलीमागेही दुष्ट हेतू असण्याचं कारण नाही. इतकी समज भाजपच्या नेत्यांना राहिली नाही. यामुळे तोंडावर पडावं लागलं. नव्हे होती नव्हतीही बाहेर आली. 

याआधी मोदींनी अशा अनेकदा चुका केल्या. भाजपतल्या एक दोन बोलघेवड्यांमुळे हे सारं ऐकण्याची वेळ पक्षावर आणि पंतप्रधानांवर ओढावली. मोदींनी वाहिलेली श्रध्दांजली चालली आणि राहुल यांनी वाहिलेली श्रध्दांजली मात्र औरंग्याची अवलाद, बुध्दू आणि मुर्ख ठरत असेल तर पंतप्रधान मोदी कोण? आपलंच वक्तव्य झेलण्याची तयारी नसली की काय फजिती होते, हे यानिमित्ताने दरेकर आणि राणे यांना कळलं तर योग्यच. काहींना आपली पक्षातली जागा सुरक्षित ठेवायची असते. यासाठी संधी मिळाली की विरोधकांवर किंवा सोनिया, राहुल, प्रियांका गांधींवर टीका करायची हौस भाजपतले हे नेते भागवतात आणि स्वत:सह पक्षाला आणि नेत्यांनाही अडचणीत आणतात.

तुलनेने भाजप नेत्यांचं शिवरायांवरील प्रेम किती बेगडी आहे, हे अनेकदा सिध्द झालंय. छत्रपतींविषयी बेताल वक्तव्यं करण्यात भाजप नेत्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. शिवछत्रपतींच्या नावाने घोषणा करण्याची कला तर भाजपचा हातचा मळ. छत्रपतींच्या नावाचा कसाही वापर केला तरी सारी पापं भाजप नेत्यांसाठी पुण्य ठरत आलेली आहेत. राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांना जुन्या काळातले आदर्श गणत आणि त्यांच्या गुरूंविषयी वायफळ वक्तव्य करत माती खाल्ली. रामदास स्वामी नसते तर छत्रपतींना कोणीही विचारलं नसतं, असं वक्तव्य करत या कोश्यारींनी आपल्या अकलेचे तारे तोडले होते. या कोश्यारींविरोधी सारा महाराष्ट्र एकवटला. तेव्हा दरेकर आणि राणे कुठल्या बिळात लपले होते? कोश्यारी नावाच्या व्यक्तीचा साधा निषेध या मंडळींनी आणि त्यांच्या पक्षाने केला नाही. उलट त्यानंतर काही महिने कोश्यारी राज्यात पदावर टिकून होते. छत्रपतींवरचं भाजपचं हे प्रेम जनतेला तेव्हाच कळून चुकलं.

अहमदनगरचा उपमहापौर हा भाजपचा नेता श्रीपात छिंदम. या माणसाने महाराजांविषयी किती घाण शिवराळ भाषा वापरली होती, हे राज्याला चांगलं ठावूक आहे. नगरपालिकेतील कर्मचारी असलेल्या अशोक बिडवे याला फोन करून शिवरायांच्या नावाने दिलेल्या शिव्या कोणत्या लायकीच्या होत्या हे सांगायची ही जागा नाही. हा माणूस आजही भाजपच्या स्थानिक निर्णय प्रक्रियेचा भाग आहे. पंढरपूरचा प्रशांत परिचारक याने सीमेवरील सैनिकांविषयी अवमानजनक वक्तव्य करत छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा केलेला अवमान विसरण्याजोगे नव्हता. ओरड झाल्यावर परिचारकाची आमदारकी काढून घेण्यात आली. लोकं विसरले आणि ती आमदारकी त्याला पुन्हा बहाल करण्यात आली. छत्रपतींच्या महतीची जाणीव नसलेले भाजपचे राष्ट्रीय नेते तर उध्दटरावांच्या कळपातच जन्मल्याची साक्ष देतात.

सुधांशू त्रिवेदी या आगलाव्या आगाऊ पक्ष प्रवक्त्याने तर सावरकरांच्या माफीनाम्यांविषयी बोलताना शिवरायांनीही मोघलांना पाचवेळा माफीनामे पाठवल्याचा उल्लेख केला. या अक्कलवान प्रवक्त्याच्या या प्रवचनाने सारं राज्य अचंबित झालं. खूप टीका झाली. मात्र भाजपवर जराही परिणाम दिसला नाही. माझ्या सभागृहात शिवाजींचं नाव घ्यायचं नाही, असं खुलेआम सांगणार्‍या राज्यसभेचे तत्कालीन सभापती व्यंकय्या नायडू यांचा देशातल्या शिवप्रेमींनी एकजात निषेध केला तेव्हा भाजप मौनात लपला होता. छत्रपती शिवरायांच्या आग्य्राहून सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंच्या तोडफोडीच्या ‘कतृत्वा’ला बहाल करताना राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना मनाची लाज वाटली नाही.

सिंधुदुर्गच्या राजगडावरील शिवछत्रपतींचा पुतळा सहा महिन्यात जमीनदोस्त होत असताना त्याच्या चौकशीचा निर्णय घ्यायची तयारी जे सरकार दाखवू शकत नाही, त्यांना राजांविषयी प्रेम आहे, असं कोण म्हणेल? या पुतळ्याच्या उभारणीत अनेकांचं उखळ पांढरं झालं, अशांना वाचवण्यात ज्यांनी अक्षम्य वेळ घेतला त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार? किमान त्यांनी इतरांवर टीका करण्याचे उद्योग तरी करू नयेत.

छत्रपतींच्या मरीनड्राईव्ह येथील नियोजित स्मारकासाठी आजवर १४०० कोटींचा खर्च का झाला? याचा काही पत्ता नाही. साधी वीट न चढलेल्या या स्मारकाचं काय झालं याचं उत्तर देण्याचं दायित्व ज्यांच्याकडे नाही त्यांनी इतरांकडे बोटं दाखवण्याचे उद्योग न केलेले बरे. ‘आजके शिवाजी’ या पुस्तकाद्वारे भाजपच्या एका नेत्याने छत्रपतींना कमी लेखण्याचा केलेला प्रकार हस्यास्पदच नव्हे तर छत्रपतींची अवहेलना करणारा आहे. आजके शिवाजी म्हणून पंतप्रधान मोदींच्या डोक्यावर जिरेटोप घालणारे नव्या ‘छत्रपतीं’ची जाणीव देशाला करून देत आहेत. छत्रपती होण्याची योग्यता शिवाजी महाराजांकडे नव्हती, त्यांनी मातेसमान मानलेल्या मुस्लिम महिलेविषयीची सावरकरांची टिपण्णी, छत्रपती शंभू राजांना बाईलवेडा आणि वाट चुकलेला म्हणून गणना करणार्‍यांची पालखी उचलणार्‍यांचं छत्रपती शिवरायांवरील प्रेम बेगडीच होय.

(लेखकाशी संपर्क भ्रमणध्वनी – ८१६९१३५२५३)

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 481
काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज प्रवीण पुरो भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

June 14, 2026

रविवार विशेष लेख: सावधान, दिवस कठीण आहेत!

June 7, 2026

भाजपची मोठी खेळी! प्रवेश करताच प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी, भाजपच्या ११ उमेदवारांची घोषणा

June 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विश्लेषण

रविवार विशेष लेख: मोदी नेहरूंशी बरोबरी करू शकतात?

By अनंत पांगारकरJune 14, 20260

पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला…

आज रविवार, १४ जून २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

June 14, 2026

गाव आणि शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय देश महासत्ता होणार नाही: भास्करराव पेरे पाटील

June 13, 2026

बनावट दारू तयार करणाऱ्यावर राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; १ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

June 13, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.