रविवार विशेष लेख… छत्रपती शिवरायांवरील बेगडी प्रेमाचा उमाळा!
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.


राहुल गांधी यांनी शिवरायांच्या जयंतीला श्रध्दांजली अर्पिली ही गोष्ट गैर होती यात वाद नाही. तिचं कोणीही समर्थन करणार नाही. मात्र हा जाणीवपूर्वक प्रकार झाला अशी आवई उठवणार्या भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपतींना वाहिलेली श्रध्दांजली जाणून घ्यावी. मोदी हे तर देशाचे पंतप्रधान. देशातल्या सार्या यंत्रणा त्यांच्यासाठी हात धुवून तयार. त्यामानाने विरोधी पक्षनेते पद देऊनही राहुल गांधी यांच्यापुढच्या सरकारकृत अडचणी काही कमी नाहीत. पंतप्रधानांसाठी सारं काही उपलब्ध असताना १९ फेब्रुवारी हा छत्रपती शिवरायांचा जन्मदिन आहे, याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला नसावी? हे पंतप्रधानांचं कार्यालय आहे की आणखी कोणाचं? चुकीच्या माहितीच्या आधारे पंतप्रधानांनी वाहिलेली श्रध्दांजली जशी जाणीवेने नव्हती तशी राहुल यांनी वाहिलेल्या श्रध्दांजलीमागेही दुष्ट हेतू असण्याचं कारण नाही. इतकी समज भाजपच्या नेत्यांना राहिली नाही. यामुळे तोंडावर पडावं लागलं. नव्हे होती नव्हतीही बाहेर आली.
याआधी मोदींनी अशा अनेकदा चुका केल्या. भाजपतल्या एक दोन बोलघेवड्यांमुळे हे सारं ऐकण्याची वेळ पक्षावर आणि पंतप्रधानांवर ओढावली. मोदींनी वाहिलेली श्रध्दांजली चालली आणि राहुल यांनी वाहिलेली श्रध्दांजली मात्र औरंग्याची अवलाद, बुध्दू आणि मुर्ख ठरत असेल तर पंतप्रधान मोदी कोण? आपलंच वक्तव्य झेलण्याची तयारी नसली की काय फजिती होते, हे यानिमित्ताने दरेकर आणि राणे यांना कळलं तर योग्यच. काहींना आपली पक्षातली जागा सुरक्षित ठेवायची असते. यासाठी संधी मिळाली की विरोधकांवर किंवा सोनिया, राहुल, प्रियांका गांधींवर टीका करायची हौस भाजपतले हे नेते भागवतात आणि स्वत:सह पक्षाला आणि नेत्यांनाही अडचणीत आणतात.
अहमदनगरचा उपमहापौर हा भाजपचा नेता श्रीपात छिंदम. या माणसाने महाराजांविषयी किती घाण शिवराळ भाषा वापरली होती, हे राज्याला चांगलं ठावूक आहे. नगरपालिकेतील कर्मचारी असलेल्या अशोक बिडवे याला फोन करून शिवरायांच्या नावाने दिलेल्या शिव्या कोणत्या लायकीच्या होत्या हे सांगायची ही जागा नाही. हा माणूस आजही भाजपच्या स्थानिक निर्णय प्रक्रियेचा भाग आहे. पंढरपूरचा प्रशांत परिचारक याने सीमेवरील सैनिकांविषयी अवमानजनक वक्तव्य करत छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा केलेला अवमान विसरण्याजोगे नव्हता. ओरड झाल्यावर परिचारकाची आमदारकी काढून घेण्यात आली. लोकं विसरले आणि ती आमदारकी त्याला पुन्हा बहाल करण्यात आली. छत्रपतींच्या महतीची जाणीव नसलेले भाजपचे राष्ट्रीय नेते तर उध्दटरावांच्या कळपातच जन्मल्याची साक्ष देतात.
सिंधुदुर्गच्या राजगडावरील शिवछत्रपतींचा पुतळा सहा महिन्यात जमीनदोस्त होत असताना त्याच्या चौकशीचा निर्णय घ्यायची तयारी जे सरकार दाखवू शकत नाही, त्यांना राजांविषयी प्रेम आहे, असं कोण म्हणेल? या पुतळ्याच्या उभारणीत अनेकांचं उखळ पांढरं झालं, अशांना वाचवण्यात ज्यांनी अक्षम्य वेळ घेतला त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार? किमान त्यांनी इतरांवर टीका करण्याचे उद्योग तरी करू नयेत.

