

संगमनेर, दि. २६ फेब्रुवारी
राजकारण हे नेहमी समाजाच्या हिताचे असायला हवे मात्र, धर्माचा आधार घेत सत्ताधाऱ्यांनी टोकाचे राजकारण केले आहे. समाज माध्यमांचा चुकीचा वापर करत यश मिळविले असले तरी जनतेच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेस पुन्हा मैदानात उतरलेली आहे. लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस आणि लोकशाही मानणाऱ्या प्रत्येकाने आता “हर हर महादेव” म्हणत पुन्हा मैदानात उतरावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
संगमनेरमध्ये मंगळवारी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची सहविचार बैठक जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी थोरात बोलत होते.
ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, प्रभावती घोगरे, मधुकरराव नवले, डॉ. जयश्री थोरात, संपतराव म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, सचिन गुजर, ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्ञानदेव वाफारे, हिरालाल पगडाल, प्रतापराव शेळके, अमृत गायके, सचिन चौगुले, शिवाजी नेहे, अरुण गावित्रे, बाबासाहेब दिघे, पंकज लोंढे, बाळासाहेब नाईकवाडी आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. मात्र त्यानंतर राज्यात सत्ताधाऱ्यांनी धर्माचे अत्यंत टोकाचे राजकारण केले. समाज माध्यमातून अनेक खोट्या गोष्टी पसरवल्या त्यामुळे पक्षाला अपयशाला सामोरे जावे लागले. लोकशाहीमध्ये जय-पराजय होत असतात. राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे तर समाज हितासाठी केले पाहिजे.
येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांसह विविध निवडणुका पार पाडणार आहे. या निवडणुकांना नव्या उमेदीने सर्वांना सोबत घेऊन सामोरे जायचे आहे. शेतकरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी काम करायला हवे. काँग्रेस पक्षाला विचारांची, त्यागाची आणि बलिदानाची मोठी परंपरा आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले मात्र अवघ्या चारच महिन्यात इतका बदल कसा होऊ शकतो हा मोठा प्रश्न आहे. ईव्हीएम बाबतही संपूर्ण देशात मोठी शंका आहे. याबाबत निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकलेलं नाही.

कोण काय म्हणाले…
प्रभावती घोगरे म्हणाल्या, विधानसभेमध्ये सत्तेच्या गैरवापरातून महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय खोटा आहे.
घनश्याम शेलार म्हणाले, बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्हाध्यक्ष जयंत वाघ म्हणाले, काँग्रेसचे मोठी परंपरा असून अहिल्यानगर जिल्हा हा काँग्रेसचा विचारांचा राहिला आहे. यापुढील काळातही थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी अधिक जोमाने काम करावे.
याप्रसंगी मधुकरराव नवले, हिरालाल पगडाल, सचिन गुजर, लता डांगे, बनसोडे आदींनी मनोगत व्यक्त केले.


