
संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी –
मोठा गाजावाजा करत संगमनेर नगरपरिषदेने पोलिसांच्या मदतीने संगमनेरमधील पाच कत्तलखाने नेस्तनाबूत केले असले तरी देखील संगमनेरात अद्यापही गोवंश हत्या सुरूच आहे. संगमनेरमधील कत्तलखान्यावर थेट अहिल्यानगर एलसीबीने कारवाई केली आहे. मंगळवारी करण्यात आलेल्या या कारवाईत १२०० किलो गोमांसासह तब्बल नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संगमनेरमधील जमजम कॉलनीमध्ये अब्दुल समद कुरेशी याच्या पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची व कत्तलीसाठी जनावरे डांबून ठेवल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, अशोक लिपणे, मनोज लातूरकर, विशाल तनपुरे यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला.
त्यावेळी एका पत्राच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने गोवंश जनावरे डांबून ठेवत ४-५ लोक जनावरांची कत्तल करत असल्याचे दिसून आले. पथकाला बघताच सर्वांनी तेथून पळ काढला. कारवाईदरम्यान पोलीस पथकाने एकाला ताब्यात घेतले. तसेच या कारवाईमध्ये पोलिसांनी ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे कत्तल केलेले गोमांस, ६० हजार रुपये किमतीच्या तीन गोवंश जातीच्या कालवडी, वजन काटा, कत्तलीसाठी वापरण्यात आलेली लोखंडी कुऱ्हाड, सुरा, टाटा कंपनीचा टेम्पो (एमएच 14 एफटी 1450) असा ९ लाख २२ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरून हस्तगत केला.

पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव मुनावर मेहबूब कुरेशी (वय ४०, रा. जमजम कॉलनी, गल्ली क्रमांक २, संगमनेर जि. अहिल्यानगर) असे असून त्याच्या अन्य साथीदारांची नावे अदनान साऊथ कुरेशी, तबरेज याकूब कुरेशी अशी असून अन्य दोघांची नावे समजू शकली नाही. हे सर्व आरोपी फरार असून आरोपींनी अब्दुल समद जावेद कुरेशी याच्या सांगण्यावरून गोवंश जनावरांची कत्तल केल्याची माहिती दिल्याने सर्व आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल तनपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १३३ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११, ३ महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम ५(ए), ५(बी), ५(सी), ९, भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुजाता थोरात या करत आहे.
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर आतापर्यंत शेकड्याने कारवाया येथील कत्तलखान्यावर करण्यात आल्या आहेत. वारंवार त्याच-त्याच कत्तलखान्यांवर कारवाया करून तेच-तेच आरोपी निष्पन्न झाले आहेत. मात्र या आरोपींविरोधात पोलीस अथवा प्रशासनाने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही. अवैध कत्तलखाने बंद करावेत या मागणीसाठी वेळोवेळी भाजपच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली. या आंदोलनामुळे येथील कत्तलखान्यांचा विषय चव्हाट्यावर आला. मात्र आता केंद्रात आणि राज्यात देखील सरकार असताना कोणतेही आंदोलन अथवा ठाम कारवाई या कत्तलखान्याविरोधात होताना दिसत नाही. मध्यंतरी येथील शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी देखील या कत्तलखान्यांविरोधात भूमिका घेतली होती, मात्र त्याचेही परिणाम अद्यापही समोर आलेले दिसत नाही.



