
संगमनेर, दि. १ मार्च
मागील तीन महिन्यापासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे, मात्र असे न होता अगदी चार तास लाईट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलता येत नाही. संगमनेर तालुक्यातील वीज पुरवठा बंद ठेवून हे पाणी पूर्वेला देण्यासाठी सत्ताधारी काम करत आहे आणि येथील नवीन लोकप्रतिनिधी त्यांच्या तालावर नाचत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, आश्वी येथे अपर तहसील कार्यालय करून संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा त्यांचा डाव आहे. याबाबत नवीन लोकप्रतिनिधीला काही माहीत नाही. तहसीलदार असा निर्णय घेतोच कसा, त्याच्यावर कोणाचा दबाव आहे ते त्यांनी सांगितले पाहिजे. जनतेचा दबाव वाढला म्हणून आता महसूल मंडळाची फेररचना करणार असे सांगत आहे, परंतु मी सहा वर्ष महसूल मंत्री राहिलो आहे. ते चुकीची माहिती देत आहेत.

पुढील काळात संगमनेर तालुक्यावर अनेक संकटे येणार आहेत. तालुक्याची अर्थव्यवस्था मोडण्याचा त्यांचा डाव आहे. चुकीच्या कामा संदर्भात सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. जनतेचा दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक गावाला पाणी देण्याच आपले नियोजन होते, त्यासाठी आपण काम केले. अडचणी येण्यापूर्वीच त्या सोडवल्या जायच्या त्यामुळे मागील चाळीस वर्षात जनतेला या गोष्टी कळाल्या नाही. आता संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडताना म्हटले की, काही गावांमध्ये सत्कार घेताना नवीन लोकप्रतिनिधीने जोरात जाहिरातबाजी केली, मात्र पाणी प्रश्न आणि मूळ समस्यांबाबत ते काही बोलायला तयार नाही. मूळ म्हणजे त्यांचे त्यांच्या नेत्यांसमोर काही चालत नाही. पूर्वेकडील नेत्यांच्या इशाऱ्यावर ते काम करत आहे हे दुर्दैव आहे, अशी भावना बुवाजीबाबा पुणेकर, आर. बी. राहणे, अरुण गुंजाळ, भास्कर बागुल, ज्ञानेश्वर सानप, ज्ञानेश्वर कडनर, सचिन काकड, गणेश भागवत, विलास वर्पे यांच्यासह जाखुरी, पिंपरने, जोर्वे, नान्नज दुमाला, जांबुत, खांडगाव, नीमज या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.
यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तीन तारखेला वीज अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून जर आठ दिवसांमध्ये पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा दिला.




