
संगमनेर, दि. ४ मार्च
महावितरण कडून विजेचा सुरू असलेला खेळ खंडोबा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्ण दाबाने वीज दिली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर शेतीचे प्रश्न निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसा सलग आठ तास वीज मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शनिवारी (८ मार्च) महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणगाव, शिवापूर, मेंढवन परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी महावितरण च्या कार्यकारी अभियंतांना आपल्या मागणीचे निवेदन दिले असून महावितरण कंपनीने विजेचा प्रश्न सोडविला नाही आणि शेतकऱ्यांच्या जीवितास वन्य प्राण्यापासून धोका निर्माण झाल्यास याला सर्वस्वी महावितरण कंपनी जबाबदार असेल असा इशारा दिला आहे.
निवेदनात ग्रामस्थांनी शेतीपंपासाठी दोन हप्ते दिवसा, एक हप्ता रात्री तसेच शक्य नसेल तर दिवसा सलग आठ तास वीज दिली जावी, अशी मागणी केली आहे. दिवसाच्या नियोजनामध्ये चार तास वीज दिली जाते त्यात जर काही फॉल्ट निर्माण झाला तर शेतकऱ्यांना तीनच तास शेतीपंपासाठी वीज मिळत असते.

तसेच रात्रीच्या वेळी सात ते आठ तास वीज दिली जात असली तरी या कालावधीत शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी शेती काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही घरापासून लांब अंतरावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमच वाघ, बिबट्या, तरस, साप अशा हिंस्र प्राण्यांचे सातत्याने दर्शन होत असते. अशा स्थितीत त्याला नाईलाजाने शेतीला पाणी द्यावे लागते.
अशा स्थितीत दिवसा शेती काम करणे शक्य असले तरी वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना काम करणे अशक्य बनले आहे. अखंडित वीजपुरवठा यामुळे पाणी असूनही शेती पिकाला पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके करपू लागले आहे. शेतकऱ्यांनी शेतीपंपाच्या विजेचे नियोजन करण्याचे लेखी पत्राद्वारे निवेदन देऊन देखील अभियंता शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न तसाच ठेवणार असतील आणि वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर याला महावितरण पूर्णतः जबाबदार असेल असा इशारा निवेदनाद्वारे देत तात्काळ या प्रश्नावर मार्ग निघाला नाही तर येत्या शनिवारी (८ मार्च) सकाळी साडेनऊ वाजता कोल्हार घोटी मार्गावर कोकणगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
कोकणगाव, शिवापुर, मेंढवन या परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी यासंबंधीचे निवेदन महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता, संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे, आमदार अमोल खताळ, संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना दिले आहे. निवेदनावर दीपक जोंधळे, रमेश शिंगोटे, अण्णासाहेब जोंधळे, हनुमंत जोंधळे, सोमनाथ जोंधळे, सतीश जोंधळे आदींच्या सह्या आहे.


