
संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आता संगमनेरात पान टपऱ्यांवर गांजा मिळू लागल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. या धंद्यांवर कारवाया होत नसल्याने तसेच संबंधितांचे आर्थिक लागेबांधे असल्याने आता हे धंदे चोरून लपून नव्हे तर उघड्यावर राजरोसपणे सुरू आहे.
पान टपरी मधून गांजा बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या एकाला संगमनेर शहर पोलिसांनी पकडले असून या कारवाईमुळे अवैधरित्या अमली पदार्थ विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाई देखील फार्स ठरू लागल्या आहेत. जवळपास सर्वच प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर प्रथम स्थानावर आहे. गर्द, हेरॉईन, गांजासह जीवितास अपायकारक असणाऱ्या अनेक पदार्थांची विक्री होत असल्याचे संगमनेरात समोर आले होते. या प्रकरणांमध्ये पोलिसांचा तपास केवळ कागदावरच राहिल्याचे दिसते. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून स्थानिक अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अधिकारी संगमनेरमधील अवैध व्यवसायाला छुपे संरक्षण देत असल्याचे बोलले जाते.


शहरातील मालदाड रोड परिसरात स्थानिक पोलिसांनी मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शिवशंभो पान सेंटर अँड कटलरी सेंटर या दुकानात केलेल्या कारवाईत पान टपरी मधून गांजाची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या शिवाजीनगर येथील अंबादास शांताराम शिंदे याला पकडले हसून त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर १५९/२०२५ अमली औषधे द्रव्य मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत ६५७० रुपये किमतीचा ७५० ग्राम गांजा पकडण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख याप्रकरणी स्वतः तपास करत असून पकडलेल्या गांजाच्या माध्यमातून पोलीस मूळ गांजा विक्रेत्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतात का हे या पुढील काही काळात समोर येणार आहे.
वारंवार तक्रारी, ओरड होऊनही अवैध धंद्यांना संरक्षण… संगमनेर मधील अवैध धंद्याच्या संदर्भात सातत्याने तक्रारी होत असतात ओरड केली जाते, मात्र याकडे कारवाई करणारे अधिकारी सर्रासपणे दुर्लक्ष करत असतात. विशेषत: हे सर्व धंदे अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील एलसीबीच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे बोलले जाते. एलसीबीसह अनेक अधिकाऱ्यांचे यात हात ओले केले जात असल्याने कारवाई होऊ शकत नसल्याचे बोलले जाते.



