
संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद सुरूच असून आता घारगाव पाठोपाठ तळेगाव येथे अपर तहसील कार्यालय करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या तळेगाव येथे हे कार्यालय सुरू करून न्याय देण्याची मागणी आज तळेगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष शरद गोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रावसाहेब दिघे, सरपंच घनशाम भारस्कर, महेश उदमले, गोविंद कांदळकर, कोंडाजी खेमनर, मच्छिंद्र घुले, निखिल सानप यांच्या शिष्टमंडळांने प्रांताधिकार्यांना निवेदन दिले आहे.

तळेगाव आणि पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात गाव आणि वाड्या वस्त्यांची संख्या आहे. ही सर्व गाव शहरापासून लांब अंतरावर असल्याने तहसिल कार्यालयात काम घेवून येणे अडचणीचे होते. वेळेत काम न झाल्यास ग्रामीण भागातील नागरीकांचा वेळ आणि पैसाही वाया जातो. तळेगाव परीसर जिरायती भाग म्हणून ओळखला जातो. विविध कारणाने नेहमीच वंचित राहीलेल्या गावांना न्याय देण्याच्या उद्देशाने कधीही विचार झाला नाही. आता अप्पर तहसिल कार्यालय सुरू करण्याचा विचार महसूल विभागाने केला असेल तर प्राधान्याने तळेगावचा विचार होणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळांने प्रांताधिकारी यांना पटवून दिले.
जिरायती भागातील ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थीनी, महीला यांना शासकीय कागदपत्रांकरीता थेट संगमनेरात यावे लागते. कागदपत्र वेळेत मिळत नसल्याने अनेक शासकीय योजनापासून लाभार्थीना वंचित राहावे लागते ही वस्तूस्थिती लक्षात घेवून अपर तहसिल कार्यालयाची सुविधा निर्माण झाली तर तळेगाव आणि पंचक्रोशीतील गावांना खरा न्याय मिळेल, आशी भूमिका निवेदनाद्वारे मांडण्यात आली आहे.


