संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी
राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीचे कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी संगमनेरमध्ये घडला होता. 
या पार्श्वभूमीवर आज शनिवारी (१५ मार्च) माजी आमदार कपिल पाटील यांच्यासह राज्यभरातील शेकडो कार्यकर्ते संगमनेरमध्ये येऊन धडकणार आहे. यामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे दिसते.
छात्र भारतीची राज्य कार्यकारिणी बैठक संगमनेरात… छात्र भारती महाराष्ट्र राज्य कार्यकारणीने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून आज थेट संगमनेरातच भास्करराव दुर्वे स्मारक भवन येथे त्यांनी राजस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यात आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली जाणार आहे.
मंत्री नितेश राणे हे गेले काही दिवस हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होईल, अशी विधाने करत आहेत. पालकमंत्री असलेल्या विखे पाटलांना छात्र भारतीचे कार्यकर्ते निवेदन द्यायला गेले होते. मंत्रिमंडळातुन राणे यांना काढून टाकावे अशी त्यांची मागणी होती. मात्र भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी छात्रभारतीच्या विदयार्थी नेत्यांना मारहाण केली. याचे प्रतिसाद महाराष्ट्रभरात उमटले आहेत. याबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. 
या पार्श्वभूमीवर छात्र भारतीचे संस्थापक सदस्य माजी आमदार कपिल पाटील संगमनेरमध्ये येत असून पोलीस अधिकाऱ्यांची, प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या तपासा संदर्भात ते माहिती घेणार आहेत. त्यांच्यासोबत छात्र भारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे व महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा कांदळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत.
छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं काय ठरतं तसेच मारहाण प्रकरणी छात्र भारती संघटना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.


