
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शनिवारी बोलावलेल्या शांतता समितीचीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दावा ठोकल्याने वाद निर्माण झाला. दोन्ही गटाचे उत्सव समितीचे कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी थेट “कायदा हातात घ्याल तर तो वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुमची इज्जत येथे घालवू नका” अशा शब्दात सर्वांना सुनावल्याने निर्माण झालेला वाद निवळला.
संगमनेरचे पोलीस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी (१५ मार्च) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती. शिवजयंती उत्सवाच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवर दोन्ही शिवसेनेकडून दावा ठोकण्यात आला. यात तोडगा निघण्याऐवजी वाद वाढत गेल्याने कार्यकर्ते पदाधिकारी थेट एकमेकांवर धावून गेले.
पोलीस उपअधीक्षक सोनवणे, पोलीस निरीक्षक देशमुख यांनी तुमची इज्जत येथे घालवू नका, कायदा हातात घालतात वापरण्याचा आम्हाला अधिकार आहे. किती वेळा आम्ही राजकीय लोकांचे मनधरणी करायची आमचीही काही जबाबदारी आहे यापुढे वाद घालणाऱ्या लोकांवर कारवाई करावी लागेल, अशा शब्दात दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी सुनावल्यानंतर वात शांत झाला. त्यानंतर बैठकीत मिरवणूक मार्ग, रस्ते, वीज आदी संदर्भात चर्चा करण्यात आली.
पोलीस उपाधीक्षक सोनवणे म्हणाले, शांतता कमिटीला एक अर्थ असतो, तुमचे सगळ्यांचे वागणे त्याला धरून नाही. वाद निवाळण्याचे काम शांतता पदाधिकाऱ्यांच्या असते. कोणत्याही गुन्ह्याचे परिणाम गंभीर असतात. ज्यांनी परिणाम भोगले ते शांततेची भूमिका घेतात मात्र नवीन लोक वाद करतात. आपल्याला मिळालेल्या राजकीय पदाची एक जबाबदारी असते. आम्ही किती वेळा राजकीय लोकांची मनधरणी करायची. आमचीही काही जबाबदारी आहे यापुढे कारवाई करावी लागेल. मिरवणुकांसाठी सर्वांना परवानगी देण्याचा आमचा प्रयत्न असून ठरवून दिलेल्या वेळेत शांततेत मिरवणुका पार पाडा मिरवणूक संदर्भात आयोजकांना सूचना दिल्या जातील असे ते म्हणाले.

वाद मिटले…
यावर्षी शिवजयंती मिरवणुकीसाठी चार वाजता शिवसेना (शिंदे) तर सहा वाजता हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गटाला परवानगी देण्यात आली आहे. तर पुढील वर्षी या उलट स्थिती असेल. चार वाजता ठाकरे गट तर सहा वाजता शिंदे गट असे नियोजन करण्यात आले असून वाद मिटल्याची माहिती शिवसेनेचे (ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली.


