रविवार विशेष… देवेंद्रजी, आवरा या सनातन्यांना!
लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.


देशभर सुरू असलेल्या होळीच्या पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये घडलेल्या अघटीत घटनेने राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. जगातली रहस्यमयी गंगा ज्या राजापूरला मिळाली, शंभू राजेंना सर्वात सुरक्षित वाटणारं ठिकाण म्हणजे राजापूर, शंभू राजांना संगमेश्वरला अटक होण्यापूर्वी सोबत असलेल्या ताराराणींना सुरक्षित ठेवण्यासाठी राजेंनी राजापूरची निवड केली होती. आरमाराने ताराराणींना राजापूरमार्गे सिंधुदुर्गला पाठवण्याच्या सूचना मावळ्यांना केल्या होत्या. जुवे बेटावर ताराराणी सुखरूप पोहोचल्याचं बक्षिस म्हणून हे बेट मालोजी खोत, शिंदे, कांबळींना इनाम म्हणून देण्यात आलं. मधू दंडवतेंचा मतदार संघ, नाणारच्या आंदोलनाचं केंद्र अशा असंख्य ओळखीचं गाव म्हणजे राजापूर. एव्हाना शांत आणि निर्गवी म्हणून ओळखल्या जाणार्या राजापूरमध्ये मिठाचा खडा पडावा अशा घटना घडत आहेत. गुरुवारच्या घटनेने सार्यांनाच हादरवून सोडलं. घडल्या घटनेने कोकण आणि कोकणी माणसाची कधी नव्हे इतकी बदनामी झाली. ज्या गतीने हे सारं घडलं, ते पाहाता महाराष्ट्र हाती ठेवण्यासाठी फडणवीस यांना प्रयत्नांची प्रचंड पराकाष्टा करावी लागेल हे सांगायला नको.
आज तशा कारवाया धुसर वाटू लागल्याचे परिणाम राजापूरच्या घटनेने दाखवून दिले आहेत. 1992 च्या मुंबईत झालेल्या दंगली असोत की त्यानंतरच्या बॉम्बस्फोटाच्या घटना असोत. हिंदू बहुल कोकणच्या किनारपट्टीने अशा गोष्टींना कधीच थारा दिला नाही. एकमेकांशी अत्यंत गोडीने आणि सलोख्याने वावरणार्या कोकणचं कोण कौतुक व्हायचं. हा आपलेपणा इतक्या जलद लोप पावेल, असं अजिबात नव्हतं. मात्र काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी या गोष्टींचा गैरफायदा घेत कोकणी तरुणांची माथी भडकवण्याचे उद्योग सुरू केले आहेत. हातच्या कामापासून दूर असलेल्या तरुणांना मंदिर आणि मशिदीच्या वादात अडकवून काहींनी आपली पोळी भाजण्याचे उद्योग सुरू केले आहेत. राजापूरच्या होलिकोत्सवाला कोकणात अनन्यसाधारण महत्व आहे. धुतपापेश्वर आणि नवलादेवीच्या पालख्यांमधून वाजत गाजत आणलेला माडाचा शेवरा जवाहर चौकातील जामा मशिदीच्या पहिल्या पायरीवर ठेवून मान देण्याची परंपरा आहे. या परंपरेचा गैरफायदा घेत ठरवून आलेल्या काही हुल्लडांनी हा शेवरा पहिल्या पायरीवर ठेवण्याऐवजी थेट मशिद आवाराच्या गेटला धडकवला आणि वादाची ठिणगी पडली. साखळीला बांधलेला गेट शेवर्याच्या धडकेने तुटला. गेट तुटल्याच्या आवेशाने मग जय श्रीरामाच्या घोषणा सुरू झाल्या. गेटला धडक देऊन जणू तीर साधला अशा अविर्भावातील हुल्लडांचा व्हिडिओतील आवेश पाहिला की त्यांचा हेतू लक्षात येतो.

