Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 15, 2026

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » रविवार विशेष लेख — कमळ झेंडा शोभतो परी सत्तेच्या घरावरी
विश्लेषण

रविवार विशेष लेख — कमळ झेंडा शोभतो परी सत्तेच्या घरावरी

लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक असून मुंबईतील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषकआहेत.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 12, 2026No Comments5 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वत:ची ओळख सांगणारा भारतीय जनता पक्ष 46 वर्षांचा झाला. भारतीय राजकारणात अनन्यसाधारण महत्व प्राप्त करणार्‍या या पक्षाचे एकेकाळी देशात केवळ दोन खासदार होते. आज त्यांची संख्या 240 आहे. गेल्या 12 वर्षात या पक्षाने स्वत:ची केलेली प्रगती अक्षरश: तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. प्रगतीचा हा आलेख सतत्याने वाढतोच आहे. 1984 साली 404 जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली त्या काँग्रेससारख्या पक्षालाही जे जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं आणि वयाची पन्नाशी गाठण्याआधी ‘घरावर झेडा’ उत्सव साजरा केला. आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या पक्षाने करून दिली. समाजमाध्यमांवर याचे पाहिलेले फोटो साजर्‍या उत्सवाला साजेसे होते. पण त्यात उत्साह किती होता, याची पडताळणी त्या पक्षाने आणि पक्षाच्या नेत्यांनी केलेली दिसत नाही. ही झेंडेगिरी करताना आपल्या मागे लोक काय बोलतात याची तमा न बाळगणार्‍यांना हे सांगून काही उपयोग नाही. तरीही माध्यम म्हणून लोकभावना त्यांच्या कानी घातलीच पाहिजे. अन्यथा आपणही त्यातलेच असं म्हणायला लोक मोकळे.

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची छबी पुढे करून त्या पक्षाने लोकसभेत घवघवीत यश मिळवलं तेव्हापासून या पक्षाच्या सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांहून वादग्रस्त निर्णयांची चर्चा अधिक होत आली. वादग्रस्त निर्णयाद्वारे जेव्हा धोरण ठरवलं जातं तेव्हा त्याचे परिणाम सामान्यांना अधिक भेडसावतात. उच्च आणि मध्यवर्गीय यात भरडतोच. पण निम्नस्तरीय कराचा बोजा उचलणार्‍यांवर त्याचे सर्वाधिक परिणाम जाणवतात. अंधभक्त वगळता देशातल्या शेतकर्‍यांपासून कामगारांपर्यंत आणि उद्योजकांपासून व्यापार्‍यांपर्यंतच्या सरकारविषयीच्या भावना पाहिल्या की लोकांमध्ये आलेल्या नैराश्याची पातळी लक्षात येते.

खरं तर सत्ता हाती येतेवेळी देशाच्या घडणीचा पाया इतका मजबूत होता की त्यानंतर या तिन्ही वर्गात सुबत्ता येऊन त्या वर्गातल्या लोकांनी ‘घरावर झेंडा’ हा भाजपचा सोहळा न सांगता साजरा केला असता. आज या सोहळ्याला आलेली मर्यादा लोकांच्या नाराजीला वाट करून देणारी ठरली आहे. जे काही झेंडे लागले त्यात सत्तेत मश्गूल असल्यांची घरं सामील असणं स्वाभाविक. सत्तेचे भक्त तर कोणाचेच नसतात. आज सत्तेवर असल्याने भाजपचे झेंडे ते घरावरच काय अगदी कंबरेलाही गुंडाळू शकतात. पतपुरवठा हे एकमेव साध्य त्यांच्यासाठी पुरेसं असतं. होयब्यासारखे ते आपल्या दारचे झेंडे बदलत असतात. अखेरची अंधभक्त नावाची जमात तर कंबरेचं सोडून वावरत असते. तेव्हा अशांकडून काही अपेक्षा नाहीत.

भाजपच्या सत्तेचं असं का व्हावं? घरावर झेंडे लावण्याचे सोहळे लोकांनी स्वत:हून का साजरे केले नाहीत, याचा विचार भाजप कधी करणार आहे की नाही? की शिव्या शाप खावून सत्ता राबवण्याचं त्यांच्या मनानेच ठरवलय हे स्पष्ट व्हायला हवं. एकहाती सत्ता आल्यापासून भाजप सरकारने घेतलेले अनेक निर्णय याला जसे कारण आहेत तसे सत्ता डोक्यात गेलल्यांच्या वर्तनाचाही प्रभाव त्यावर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या गोष्टींचा त्या पक्षाने सारासार विचार केलेला दिसत नाही.

नोटबंदीसारख्या निर्णयापासून इराणविरोधी राबवलेल्या परराष्ट्र धोरणाने भारताची मान शरमेने वाकली तरी सरकारला त्याचं काही वाटलं नाही. जीएसटीचा आणि शेतकर्‍यांवर अन्यायी कृषी कायद्यांचा निर्णय घेताना सरकारने अतिरेक केला. तरी या सरकारला त्याचं काही पडलं नाही. अशा परिस्थितीत त्या पक्षाचा झेंडा आपल्या घरावर लावावा असं लोकांना तरी का वाटावं? शरम कोळून प्यायल्यावर योग्यतेच्या सीमारेषा पुसटतात असं म्हणतात. सरकारचं तसंच झालंय. आपणच योग्य असल्याच्या मानसिकतेने सरकारचं हसं झालं.

नोटबंदीच्या निमित्ताने सरकारने केलेला खोटारडेपणा कोणीही विसरू शकत नाही. महाराष्ट्र हे त्यांच्यासाठी चरावू कुरण होतं. रोहन रात्रेकर याच्यासारख्या पंतप्रधान कार्यालयातल्या कथित अधिकार्‍याच्या निगराणीखाली नोटांची झालेली लयलूट माध्यमांवर न दिसताही लोकांच्या चर्चेचा विषय बनली. दहशतवादी कारवायांना आळा बसवण्याबरोबरच भ्रष्टाचाराचा समूळ नाश आणि काळा पैसा शोधून काढण्याच्या नावाखाली भाजपप्रणित संस्थांनी नोटांची चक्क वाटमारी केली.

महाराष्ट्रासारख्या समृध्द राज्याची सहकार मोहीम नेस्तनाबूत केली. सहकारी बँकांना टाळं लागलं आणि अमित शहांसारख्यांच्या बँकांना वारेमाप नव्या नोटा बदलून गुजरातच्या सहकाराचा पाळणा हलवता ठेवला. नोटबंदी का आणली याचं उत्तर जेफ्रीच्या फाईलमधून बाहेर आल्यावर कळलं भारताची आर्थिक कोंडी करण्याचं नोटबंदी हे षडयंत्र होतं. यातून ना दहशतवाद संपला ना काळापैसा बाहेर आला, भ्रष्टाचार संपला ना महागाई थांबली. सत्ताधारी पक्षाचं काम झालं आणि दोन हजारच्या नोटही चालनातून रद्द झाल्या. 50 दिवसांचा कालावधी मागणारी भाजपची सत्ता आणि सत्तेचे प्रमुख नरेंद्र मोदी देशातल्या जनतेशी निष्ठूरपणे वागले.

जीएसटीसारख्या जिझिया कराने सर्वांचंच कंबरडं मोडलं. या कराचा सर्वाधिक 70 टक्के वाटा सामान्यांच्या खिशातून ओरबाडला जात असताना श्रीमंत आणि अति श्रीमंत मात्र मजा मारत आहेत. सरकारच्या या नीतीने वसुलीला बसलेल्यांची चंगळ केली. देशातल्या शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍या कृषी कायद्याने या सत्तेने देशाची लाज जगात घालवली. या कायद्याविरोधी लढा देणार्‍या शेतकर्‍यांच्या वाट्याला सत्तेने आणलेल्या यातनांचा विचारही विदिर्ण वाटतो. सुमारे आठशे शेतकर्‍यांचा जीव घेणार्‍या या कायद्यांचा अंमल करण्यासाठी सरकारने उचललेलं पावूल हे स्वत:ला कृषीप्रधान समजणार्‍या देशासाठी लाजीरवाणंच नव्हे तर देशाची मान शरमेने खाली घालायला लावणारं होतं.

ज्याला जीडीपी म्हटलं जातं तो देशाचं सकल उत्पादन वाढत असल्याचा सतत ढोल बडवणार्‍या सरकारने वर्षाकाठी दोन कोटी तरुणांना नोकर्‍या देण्याचं दिलेल्या वचनाचं काय झालं, इतका प्रश्‍न घरावर ज्यांनी झेंडे लावले त्या भाजपच्या नेत्यांनी स्वत:ला विचारावं. दोन कोटी इतक्या तरुणांना नोकर्‍या देण्याच्या वचनाच्या पूर्ततेतून एकही तरूण नोकरीसाठी वणवण फिरताना दिसला नसता. न सांगता त्याने आपल्या घरावर कमळाची छबी रेखाटली असती. उत्पादित भारताच्या मालमत्तांचं खासगीकरण करून काही मोजक्यांची भर करण्याचं काम सत्तेने इमाने इतबारे केलं.

वाढत्या महागाईने देशवासीय कण्यातून वाकलाच नाही तर त्याचा कणा मोडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. महागाईवर नियंत्रण ठेवणार्‍या यंत्रणेतल्यांनी याचाच फायदा घेत स्वत:चे खिसे भरले. महागाईपासून वाचवायला सामान्यांना कोणी वाली नाही. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडूनही सत्तेला त्याचं काही पडलेलं दिसत नाही. सत्तेची अविरत स्वप्नं पडणार्‍यांनी ईडी, सीबीआय, आयकर, नार्कोटिक सेलचा वापर इतक्या नीच पध्दतीने केला की त्याची तुलनाच करता येणार नाही. अबाधित सत्ता हे एकमेव सूत्र यामागे दडलं असल्याने सत्ता राबवणार्‍यांना अशा कारवाया ऊब देणार्‍या ठरल्या. जाब विचारणार्‍या संसदेतील विरोधकांवर निलंबनाची कारवाई करणार्‍यांना आपलं बिंग फुटते याचीही तमा नाही.

कोरोना महामारीच्या नावाखाली पीएम केअर नावाच्या फंडाचा व्यक्तीगत वापर करणं, इलेक्ट्रोल बॉण्डच्या नावाखाली पक्षाच्या झोळ्या भरण्याचे उद्योग, याद्वारे ठराविक कंत्राटदारांवर कोट्यवधींची खैरात करणं यातून देश कुठे गेला हे घरावर झेंडे लावणार्‍यांनी स्वत:ला विचारून पहावं. म्हणजे झेंडे लावण्यात सामान्यांचा सहभाग का नव्हता हे कळायला सोपं जाईल. लडाखमध्ये चीन घुसखोरी करत असल्याचं ओरडून सांगणार्‍या सोनम वांगचूक सारख्यांना तुरुंगवासात टाकणार्‍या सत्तेतल्या झेंडेधार्‍यांनी एकदा रामरहिम आणि आसारामसारख्या नीच व्यक्तींसाठी सत्ता आणि सत्तेचे दलाल किती वाकतात त्याचं अवलोकन करावं. त्यांच्यासाठी पॅरोल कसा वापरला जातो आणि तरुण विद्यार्थी जो मुस्लिम आहे म्हणून जामिनाला कसा मुकतो ते एकदा पडताळावं. पुलवामासारख्या घटना घडूनही त्याची साधी चौकशी न करणार्‍या सत्तेचे, ज्या सत्तेने पठाणकोटच्या लष्करी तळाचं पाकिस्तानी आयएसआयला दर्शन घडवलं त्या सत्तेचे सगळे गुलाम होवून घरावर झेंडे लावतील, असं ज्यांना वाटतं अशा लाचारीचं जिणं जगणार्‍यांसाठी घरावरचे झेंडे लखलाभ.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 250
प्रवीण पुरो रविवार विशेष विश्लेषण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

रविवार विशेष लेख — म्हणजे चोरी झालीच नाही?

July 12, 2026

रविवार विशेष लेख : महाराष्ट्राची बदनामी कशी होते, इन्फ्राभाऊ?

July 12, 2026

रविवार विशेष लेख — लातोंके भूत बातोंसे नही मानते…!

July 5, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By अनंत पांगारकरJuly 15, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय…

पोलीस दलातील बहुचर्चित अंमलदार चौधरी यांचे निलंबन, एसपींचा मोठा निर्णय

July 15, 2026

घारगावमध्ये केमिकलयुक्त ताडीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्कचा छापा; २२० लिटर ताडी नष्ट!

July 15, 2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

July 15, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.