
नाशिक, दि. २० मार्च –
नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगरजवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी (१९ मार्च २०२५) रात्री ९ ते १० च्या सुमारास दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. उमेश उर्फ मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या सहा तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात वर्चस्व राखण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. क्राईम ब्रांच युनिट १ च्या पथकाने तपास सुरू केला असता, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी आणि हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी सागर गरड आणि त्याचे साथीदार नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील डाळिंब मार्केट येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पाच जणांना अटक केली. सागर मधुकर गरड (वय ३२, रा. आंबेडकरवाडी, उपनगर, नाशिक), अनिल विष्णू रेडेकर (वय ४०, रा. उत्तरानगर, पोतदार शाळेजवळ, तपोवन रोड, नाशिक), सचिन विष्णू रेडेकर (वय ४४, रा. गायत्री नगर, पुणे रोड, नाशिक), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे (वय २६, रा. सर्वेश्वर चौक, नवीन सिडको, उत्तमनगर, नाशिक) व योगेश चंद्रकांत रोकडे (वय ३०, रा. आंबेडकरवाडी, उपनगर, नाशिक) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपींना उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, सुदाम सांगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. तसेच, पंचवटी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी आणि तांत्रिक विश्लेषण विभागातील कर्मचाऱ्यांनीही या कारवाईत मदत केली. या घटनेमुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


