
मुंबई, दि. २० मार्च – विशेष प्रतिनिधी
संगमनेर शहरात सुरू असलेली गोवंश हत्या आणि शहरातील मोक्याच्या जागा तसेच तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव येथील देवस्थान जमिनी वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीरपणे नोंदणी झाल्याचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडून राज्य सरकारचे या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले.
संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगररोडवरील सर्व्हे नंबर १४९ (जुना सर्व्हे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर १६२ व १७९ येथील कानिफनाथ देवस्थान, सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान आणि पारेगाव येथील श्री अश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्या हक्काच्या संपूर्ण जमिनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने दावा करत आहे.
यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने या जमिनीबाबत योग्य ती कार्यवाही करून त्या देवस्थानांच्या नावावर परत कराव्यात. तसेच हिंदू धर्मियांच्या देवस्थानांवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत, अशी लक्षवेधी विधानसभेत मांडून या मुद्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधले.
संगमनेर शहरात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर कत्तलखाने सुरू आहेत. या कत्तलखान्याच्या चालक व मालकांवर वारंवार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातात, मात्र प्रत्येक वेळी गोवंश कत्तल करणारा माणूस तोच असतो. गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगळा माणूस उभा केला जातो. मुख्य आरोपीवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांचे चांगलेच फावले जात आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी या कत्तलखान्याच्या विरोधात आंदोलन करूनही हे बेकायदेशीर कत्तलखाने बंद होत नाहीत. त्यामुळे शासनाने अनधिकृत कत्तलखान्यांवर योग्य ती कारवाई करून गोवंश हत्या बंदी करावी, अशी लक्षवेधी करत संगमनेरमध्ये सुरू असलेली गोहत्या थांबविण्यात यावी, अशी मागणी करत राज्य शासनाचे खताळ यांनी लक्ष वेधले.

पुणे जिल्ह्यात थेरगाव येथील हनुमान नगरमध्ये अनधिकृत मदरसा व मशिदीच्या बांधकामामुळे नागरी असुविधा आणि वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या भागात अनेक बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. त्यामुळे घरात घुसून स्त्रियांचे विनयभंग आणि अत्याचार यांसारखे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे हे मदरसे आणि मशिदी जमीनदोस्त कराव्यात, अशी मागणी केली.
सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई… पुणे जिल्ह्यात थेरगाव येथे अनधिकृत बांधकाम झाले आहे. त्यावर कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेचे किंवा नगरपालिकेचे आहेत. तरी तुम्ही केलेल्या लक्षवेधीची राज्य शासनाने दखल घेतली आहे. संबंधित संस्थेला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देत आहोत. संगमनेर मतदार संघामध्ये अनेक चुकीच्या घटना घडत आहेत. याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.



