
मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विधान परिषद आणि विधानसभा सभागृहांमध्ये सभापती आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपाती आणि एकांगी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. गुरुवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले.
विधानसभेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात संसदीय परंपरांचे पालन व्हावे, नियमबाह्य कामकाज होऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे केली आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने सभापती आणि अध्यक्षांच्या मनमानी आणि एकांगी कामकाजाची तक्रार राज्यपालांकडे केली.
विरोधी पक्ष हा संसदीय प्रणालीतील महत्त्वाचा घटक असून, त्यांची भूमिका सरकारविरोधी नसून सरकारचे निर्णय आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरणे सुचवणे हे त्यांचे काम आहे, याकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून, महत्त्वाच्या चर्चांमध्ये नियमबाह्य पद्धतीने त्यांची अडवणूक केली जाते, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्यांच्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही.

पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असतानाही ते उपस्थित राहत नाहीत. तसेच, सभागृहाच्या गॅलरीत संबंधित खात्याचे सचिवही उपस्थित नसतात. संबंधित खात्याचे राज्यमंत्री उपस्थित असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्यांना चर्चेला उत्तर देण्याचा अधिकार दिला जातो, असेही विरोधी पक्षांनी निवेदनात म्हटले आहे.
विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष सभागृह चालवताना निष्पक्षता दाखवत नाहीत आणि त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे, असे पत्र विरोधी पक्षांनी राज्यपालांना दिले आहे. राज्यपालांनी यात लक्ष घालून विरोधी पक्षाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
राज्यपालांना भेटलेल्या शिष्टमंडळात काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, नाना पटोले, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, अनिल परब, ज. मो. अभ्यंकर, मनोज जामसुतकर, सचिन अहिर, भाई जगताप, भास्कर जाधव, सुनील राऊत, प्रवीण स्वामी, वरुण सरदेसाई, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील यांचा समावेश होता.


